उंब्रज – कॉंग्रेस व राष्ट्रवादी पक्ष मताचे दान घेऊन पळून जाणारा भ्रष्टाचारी पक्ष असल्याची खरमरीत टिका करून भाजप हा पक्ष मताचे दान घेऊन विकास साधणारा पक्ष असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. उंब्रज ता. कराड येथील लक्ष्मीनगर येथे आ. जयकुमार गोरे यांच्या विकास निधीतून मंजूर सभामंडप भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. अतुल भोसले, आण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, विक्रांत पाटील आदी. मान्यवरांची उपस्थिती होती.
बावनकुळे म्हणाले, पाच वर्षानी पंजाचे बटण दाबले; तर देशात दुराचार, भ्रष्टाचार, काळा पैसा व काळ्या पैशापासून सत्ता आल्यावर ते पाच वर्षे गायब होतात. तर कमळाचे बटण दाबल्यावर हा देश जगातील सर्वात मोठा पक्ष होवू शकतो. भाजपचे काम आहे; तुमच्या मताचे कर्ज घेऊन विकासकामे साकार करून त्याची व्याजासह परतफेड करणे. तुम्ही घड्याळाला मते दिली.
मात्र, ते या समाजाकडे लक्ष देत नाहीत. परंतु, यापुढे भाजप आपल्या समाजाच्या उद्धारासाठीच प्रयत्नशील आहे. या समाजाच्या सर्व मागण्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून सोडविले जातील. असा विश्वास व्यक्त करत यापुढील पिढी पैशाने श्रीमंत नव्हे; तर शिक्षणाने श्रीमंत असणार असून शिक्षणाच्या प्रवाहात सर्व समाज येणे गरजेचे असल्याचे मतही बावनकुळे यांनी व्यक्त केले.
आ. जयकुमार गोरे म्हणाले, गेली अनेक वर्षे लक्ष्मीनगर येथील गोसावी समाज गटार, रस्ते या सोयी-सुविधापासून वंचित आहे. मात्र, यापुढे हा समाज सोयी-सुविधापासून वंचित राहणार नाही. या भागाचा जो कोणी लोकप्रतिनिधी असेल; त्याला शरम वाटली पाहिजे, अशी टीकाही त्यांनी केली.