उंडाळे – कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने आत्तापर्यंत धनगर समाजाचा वापर फक्त स्वत:च्या स्वार्थासाठी व मतांसाठी केला. परंतु, धनगर समाजाच्या हिताचा विचार करणारा कोणता पक्ष असेल, तर तो फक्त भाजपा आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असून तो सोडविण्यासाठी केंद्राच्या माध्यमातून नक्कीच प्रयत्न केले जातील. समाजाला न्याय दिल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
नांदगाव ता. कराड येथे शुक्रवारी दि. 11 रोजी भाजपाच्यावतीने आयोजित धनगर समाजबांधवांच्या भव्य मेळाव्यात ते बोलत होते. भाजपाच्या लोकसभा प्रवास योजनेअंतर्गंत आ. बावनकुळे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. सायंकाळी नांदगाव येथे त्यांचे ढोलांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच धनगर समाजाच्यावतीने पारंपरिक घोंगडे व लाठी देऊन उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
व्यासपीठावर भाजपाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, प्रदेश सचिव विक्रम पावसकर, ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आ. बावनकुळे म्हणाले, देशात 22 कोटींहून अधिक धनगर समाज संघटीत झाला आहे. भाजपाने या समाजाच्या उन्नतीसाठी सदैव प्रयत्न केले असून महाराष्ट्रातून भाजपाने खासदार डॉ. विकास महात्मे यांना राज्यसभेचे; तर आ. गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेचे सदस्यत्व देऊन संपूर्ण धनगर समाजाचा गौरव केला आहे. येत्या काळात कराडमध्ये धनगर समाजाचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय मंत्री ना. एस. पी. बघेल यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम घेण्याचे नियोजन असून येत्या काळात देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये धनगर समाजाला मोठे नेतृत्व करण्याची संधी मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
डॉ. अतुल भोसल म्हणाले, गेल्या भाजपा सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या हितासाठी अनेक योजना राबविल्या. करोनाच्या संकट काळात लोकांची काळजी घेण्यासाठी त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला. नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणामुळे आज भारत जगात आघाडीवर आहे. लोकहितासाठी काम करणाऱ्या भाजपाला मजबूत करण्यासाठी येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सर्व जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आणून, भाजपाचाच जिल्हा परिषद अध्यक्ष बनविणार असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच लोकसभेला कराड दक्षिणमधून मोठे मताधिक्य मिळवून देण्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
कराड दक्षिणमध्ये आता एकच बाबा, अतुलबाबा !
“”कराड दक्षिणमध्ये डॉ. अतुलबाबा भोसले धनगर समाजाला उभारी देण्यासाठी प्रयत्नरत आहेत. पक्ष त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असून आपण सर्वांनीही त्यांना पाठबळ द्यावे. दक्षिणमध्ये आता एकच बाबा राहतील, ते म्हणजे फक्त अतुलबाबा..!”, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी करताच, सभागृहातील सर्व धनगर समाजाबांधवांनी अतुलबाबांच्या विजयाच्या घोषणा दिल्या.
अतुलबाबांना आमदार म्हणून विधानसभेत पाठवा
भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर नाव न घेता टीका केली. आ. गोरे म्हणाले, ते “मोठे’ आहेत, म्हणून कुणाच्याही मागे उभे राहू नका. जो तुमच्या मदतीसाठी इथे तत्पर आहे, असे फक्त अतुलबाबाच आहेत. त्यामुळे त्यांच्या मागे राहून, मी जेव्हा 2024 ला विधानसभेत जाईन तेव्हा अतुलबाबांना आमदार म्हणून माझ्यासोबत पाठवून देण्याची जबाबदारी तुमची आहे, असे आवाहन आ. जयकुमार गोरे यांनी उपस्थितांना केले.
=================
=======================