मुंबई : शिंदे गटाचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी राज्यात नवीन सरकार आल्यापासून विरोधकांवर खोचक शब्दांत टोलेबाजी करण्याची एकही संधी सोडलेली नाही. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दसरा मेळाव्यातील भाषणांसंदर्भात केलेल्या विधानावरून शहाजीबापू यांनी त्यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे.
अजित पवार यांना माध्यम प्रतिनिधींनी “दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे भाषण एकाच वेळी सुरू झालं तर कुणाचं भाषण ऐकणार?” असा प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार म्हणाले, “एकाच वेळी दोन्ही भाषणं सुरू झाली तर मी आधी उद्धव ठाकरेंचं ऐकेन आणि नंतर एकनाथ शिंदेंचं ऐकेन. अर्ध्या तासाने काही फरक पडणार नाही.”असे म्हटले होते.
दरम्यान, अजित पवारांच्या याच विधानावरून शहाजीबापूंनी त्यांना खोचक टोला लगावला आहे. “अजित पवारांना आता ही दसऱ्याची भाषणं ऐकणं, इंदुरीकर महाराजांचं कीर्तन ऐकणं हेच काम राहिलंय. भाषणं ऐकण्याशिवाय अजित पवारांना दुसरं काही काम उरलं नाहीये. ते विरोधी पक्षनेते झाले आहेत. पण ते कसं करायचं असतं ते त्यांना अजून कळत नाहीये. कारण अजित पवार कायम सत्तेवर राहिले आहेत. ते अजित पवारांना समजलं, पण हे अजून समजेना”, असे शहाजीबापू म्हणाले.
तसेच पुढे बोलताना अजित पवार आणि भाजपा पुन्हा एकत्र येतील का? असा विचारल्यावर शहाजीबापू पाटील यांनी मिश्किल टिप्पणी केली. “हा मुद्दा काही माझ्यासारख्या छोट्या माणसाचा नाही. माझं आणि अजित पवारांचं नातं जिव्हाळ्याचं आहे. पण अजित पवार काय करतील हे शरद पवारांनाही कळलं नाही, ते मला कसं कळणार? त्यामुळे अजित पवार कधी कुठला झटका देतील काही सांगता येत नाही”, असे शहाजीबापू पाटील म्हणाले.