2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आतापासूनच तयारीला लागला आहे, यामागे त्यांची छुपी अस्वस्थता तर नाही ना?
राहुल गांधी यांची “भारत जोडो यात्रा’, गोव्यातील ऑपरेशन लोटस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे “चित्ता’कर्षण या घडामोडींमुळे देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापविलं. येत्या काही महिन्यांत गुजरात आणि हिमाचल प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होणे आहे. यामुळे राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. केंद्रातील सत्ताधारी भाजप नेहमीच इलेक्शन मोडमध्ये असल्याने विरोधी पक्षांनीसुद्धा दंड थोपटले आहे. एकेकाळी इंदिरा गांधी यांच्या काळात कॉंग्रेस खूप मजबूत होती. त्या कुणालाही जुमानत नव्हत्या. तेव्हा देशातील तमाम विरोधी पक्ष इंदिरा गांधी यांचा सामना करण्यासाठी एकजूट झाली होती. पुढे चालून हीच एकजुटता विरोधकांच्या कामी आली आणि इंदिरा गांधी यांना पराभव पत्करावा लागला. सध्या, देशात याच घटनेची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष फार मजबूत झाला आहे. आता भाजपही कुणाला जुमानत नाही आहे.
अशात, सत्तर-ऐंशीच्या दशकाप्रमाणे विरोधी पक्षांनी पुन्हा एकजूट व्हायला सुरुवात केली आहे. भाजपने केवळ कॉंग्रेसमुक्त मोहीम छेडलेली नाही तर; विरोधी पक्षमुक्त देश अशी मोहीम हाती घेतली असल्याचे दिसून येते. एकेकाळी कॉंग्रेसच्या विरोधात विरोधीपक्ष एकजूट झाले होते आणि आता कॉंग्रेसला सोबत घेऊन विरोधक एकजूट होताना दिसत आहेत. याच काळात कॉंग्रेसला सोबत न घेता तिसरी आघाडी बनविण्याचा प्रयत्नसुद्धा झाला. परंतु, त्यात त्यांना फारसे यश आले असे दिसून येत नाही. यात किंचितही दुमत नसावे की, कॉंग्रेसला सोबत घेतल्याशिवाय विरोधकांची एकजूट शक्य नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे प्रत्येक राज्यात कॉंग्रेसचे अस्तित्व आहे. मात्र, वारंवार होणाऱ्या पराभवामुळे त्यांची संघटना सुप्त झाली आहे. आता कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. त्यामुळे कॉंग्रेस नव्याने मुसंडी मारेल आणि विरोधकांनाही त्याचा फायदा होईल.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला सोबत घेऊन जो प्रयोग केला आहे त्याचा परिणाम हा केवळ बिहारपर्यंत सीमित राहील आणि त्याचा प्रभाव देशभर पसरणार नाही, यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही आणि हे समजण्यासाठी राजकीय विश्लेषक असण्याचीही गरज नाही. बिहारची घटना म्हणजे नितीशकुमार यांनी भाजप आणि मोदी यांना दिलेला जबरदस्त धक्का होय. एनडीएशी संबंध तोडून महाआघाडीसोबत नवे सरकार स्थापन केल्यानंतर नितीशकुमार यांनी आपल्या पहिल्याच दिल्ली दौऱ्यात विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत मॅरॅथॉन बैठका घेऊन विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. महत्त्वाचं म्हणजे, याचा परिणामही लगेच दिसून आला. उदाहरण घ्यायचं झालं तर उत्तर प्रदेशचे घेता येईल. लखनौ येथील समाजवादी पक्षाच्या कार्यालयाबाहेर “यूपी बिहार-गई मोदी सरकार’ असे बॅनर लागल्याचे दिसून आले. या बॅनरमुळे आगामी काळात विरोधकांचे आव्हान वाढण्याची भीती केंद्रातील सत्ताधारी नेत्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
नितीशकुमार सध्याच्या सत्ताधीशांच्या विरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा जो प्रयत्न करीत आहेत त्याचा परिणाम भाजपविरोधी लाटेला ऑक्सिजन पुरविण्याचे काम करेल यात दुमत नाही. मोदी-2 च्या काळात सुमारे पंधरा-सोळा राष्ट्रीय आणि क्षेत्रीय पक्ष एकजुटीने सरकारविरुद्ध आवाज उठवत आहेत. जनतेच्या विविध प्रश्नांवर समान भूमिका घेत आहेत, याची वेगळी आठवण करून देण्याची गरज नाही. मात्र, नितीशकुमार विरोधी राजकारणात स्वतःसाठी महत्त्वाची भूमिका शोधत असल्याने ही ताकद आणखीनच वाढणार आहे. याचा अर्थ असा नक्कीच नाही की, येत्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध विरोधी पक्षाचा एकच उमेदवार मैदानात राहील. सध्या याची शक्यता कमी आहे. शिवाय, विरोधकांना एकत्र करण्याची ही जेमतेम सुरुवात होय, हे विसरून चालणार नाही.
नितीशकुमार यांच्या दिल्ली दौऱ्यापूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि टीआरएस सुप्रिमो के. चंद्रशेखर राव यांनी पाटणा गाठून त्यांची भेट घेणे हा केवळ योगायोग नक्कीच नव्हे. या नेत्यांनी तिसरी आघाडी उभारण्यासाठी एकमेकांना एकमेकांची मदत करावी लागेल या मुद्द्यावर चर्चा केली असं म्हणतात. भाजपचा पराभव हा आपला प्राथमिक हेतू असला पाहिजे असंही त्यांचं म्हणणं आहे. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांनीही नितीशकुमार यांची दिल्लीत भेट घेतली होती आणि चौधरी देवीलाल यांच्या स्मरणार्थ वार्षिक राजकीय मेळाव्यासाठी त्यांना आमंत्रित केले. अनेक विरोधी पक्षांना आमंत्रित करण्यात आलेला हा मेळावा या महिन्याच्या अखेरीस होणार आहे. विरोधक एकजुटीचे प्रयत्न करीत आहेत हे सगळं खरं असलं तरी, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल-डावे पक्ष, तेलंगणात टीआरसी-कॉंग्रेस, दिल्लीत आप-कॉंग्रेस या पक्षातील त्यांच्या राज्यात अस्तित्वात असलेला एकमेकांचा विरोध अद्याप संपुष्टात आलेला नाही आणि तशी शक्यतासुद्धा नाही.
गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे आणि 2024 मधील लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी किमान डझनभर राज्यांत विधानसभेची निवडणूक होणे आहे. या सर्व निवडणुकीत विरोधक भाजपविरुद्ध आपला संयुक्त उमेदवार उतरवतील का? तर याचे उत्तर नकारार्थी असेच आहे. हेही खरं असलं तरी, जनतेच्या स्टॉक मार्केटमध्ये विरोधी पक्षांचे भाव हळूहळू वाढत चालले आहेत, हे मान्य करावे लागेल. सत्ताधारी पक्षावर विरोधकांच्या टीकेची दिशा जसजशी अधिकाधिक एक होत जाते, तसतसा त्यांचा आवाज बुलंद होताना दिसत आहे. हाच परिणाम मुख्यतः राज्य पातळीवर भाजपविरुद्धच्या लढतींना कलाटणी देण्यासाठी उपयुक्त ठरेल. म्हणूनच, व्होटबॅंक आणि जागांच्या समीकरणापेक्षा महत्त्वाचे आहे ते भाजपविरुद्ध निर्माण होत असलेली लाट. तमाम विरोधी पक्ष रस्त्यावर उतरून मोदी सरकारवर टीका करीत आहेत. वर्षभर चाललेली आणि विजयी झालेली शेतकरी चळवळ आणि कामगार तसेच इतर वर्गांच्या विविध चळवळी याचे उदाहरण होय. “भारत जोडो यात्रा’ ही देखील अशीच एक कृती आहे, जी मोदी सरकारच्या धोरणांवर आणि कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत आहे. अर्थात, या दौऱ्याची आखणी, त्यात दिसणारे कॉंग्रेसचे प्राधान्यक्रम आणि मोदी यांच्यावर होणाऱ्या टीकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकते. या यात्रेत कॉंग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनी सर्वात महत्त्वाची खबरदारी घ्यायची आहे आणि ती म्हणजे की यात्रा राहुल गांधी केंद्रित राहता कामा नये.
टीआरएससारखे पक्ष भाजप आणि केंद्र सरकारच्या विरोधात विविध पातळीवरील विरोध प्रदर्शन करून जातीय ध्रुवीकरणाच्या विरोधात वातावरण निर्माण करण्यास हातभार लावताना दिसत आहे. अशाप्रकारचे विविधांगी प्रयोग करून देशात मोदी यांच्याविरुद्ध वातावरण तयार केले जात आहे. कदाचित म्हणूनच भाजपच्या छावणीत अस्वस्थता वाढली आहे. याच अस्वस्थेमुळे अख्खी सत्ताधारी छावणी 2024 च्या कामाला लागली आहे. केवळ कामाला लागलेली नाही तर केंद्र सरकारच्या कामकाजाची माहिती ढोल वाजवून-वाजवून देत आहे. विरोधी पक्षांच्या सरकारांवरही हल्लाबोल करीत आहे. यात राहुल गांधींचे महागडे टी-शर्ट, शूज आदींपासून ते प्रवासात रात्री झोपण्यासाठी ट्रकवरील कंटेनरपर्यंत आणि कन्याकुमारीला भेट देणाऱ्या राहुल गांधींनी विवेकानंदांच्या पुतळ्यासमोर डोके न टेकवण्यापर्यंतच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधून विरोधकांची धार बोथट करण्याचे प्रयत्न सुरू आहे. गोव्यात कॉंग्रेसचे दोनतृतीयांश आमदार फोडण्याचा प्रयत्न अस्वस्थेतूनच निर्माण झालेला आहे. विरोधी पक्ष जसजसे आक्रमक होत जाईल तसतशी सत्ताधारी पक्षांची ही अस्वस्थता वाढत जाईल यात दुमत नाही. आक्रमक विरोधी वारे जसजसे झेपावतील तसतशी ही अस्वस्थता वाढत जाईल.