ता. 20, माहे ऑगस्ट, सन 1975
पुणे, दि. 19 – तत्त्वज्ञान केवळ अद्वैत आहे. ते समजावून सांगताना सांगणारा व ऐकणारा यांच्या प्रवृत्तीनुसार फरक पडतो पण परिणाम मात्र एकच होतो, असे उद्गार वैद्य अनंतराव आठवले यांनी आज “ज्ञानदेवाचे तत्त्वज्ञान’ या विषयावर बोलताना काढले. ते पुढे म्हणाले, शंकराचार्यांचे मत प्रमाण-प्रमेय व्यवहार सारखा असे होते. माणसाचे इतर प्राण्यांपासून वेगळे वैशिष्ट्य धर्मामुळे आहे. त्यांच्यासाठी त्यांचा स्वधर्मच श्रेष्ठ ठरतो. नुसते तत्त्वज्ञान माणसाला निरुपयोगी ठरते. म्हणून त्यांची धर्माशी सांगड घालून सांगावे लागते म्हणून ज्ञानेश्वरांनी तत्त्वज्ञान सांगताना आई जशी सर्व मुलांना त्यांना आवडेल असे जेवण देते तसेच आईच्या दृष्टिकोनातून सर्व थरांतील लोकांना पटेल असे तत्त्वज्ञान सांगितले.
उच्च माध्यमिक शिक्षणात इतिहासाला स्थान द्यावे
पुणे – उच्च माध्यमिक शिक्षणक्रमात इतिहास हा विषय ऐच्छिक ठेवल्याने बहुसंख्य शाळांनी हा विषय ठेवलेला नाही. त्यामुळे 12वी इयत्तेत व महाविद्यालयात हा विषय शिल्लक राहणार की नाही अशी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कला, शास्त्र आणि वाणिज्य या तिन्ही शाखांत उच्च माध्यमिक स्तरावर इजिहास हा सक्तीचा विषय ठेवावा, असे निवेदन माध्यमिक शिक्षण मंडळाकडे देण्याचा निर्णय इतिहास शिक्षण मंडळाच्या या बैठकीत घेण्यात आला. इतिहासाला जोडून राज्यशास्त्र, अर्थशास्त्र व समाजशास्त्र यापैकी एक विषय घेण्याची योजना माध्यमिक शिक्षण मंडळाने करावी.