पिंपरी – ऑगस्ट महिना म्हणजे पर्यटनाची पर्वणीच असते. पावसाची रिमझीम, त्यात धरणीमाता हिरवा शालू नेसून नटलेली असते. त्यामुळे निसर्गाचे हे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची पर्यटनस्थळी गर्दी होत असते. मावळातील निसर्ग सौंदर्य या काळात अधिक खुलून आलेले असते. शनिवार (दि. 13), रविवार (दि. 14) स्वातंत्र्य दिन (दि. 15) आणि पारशी नव वर्ष दिन (दि. 16) अशा सलग चार सुट्या आल्याने पर्यटकांनी ही संधी साधण्यासाठी लोणवळा, मावळ परिसरातील सर्व पर्यटन स्थळांचे बुकिंग फुल्ल झाले आहे.
मावळ परिसर हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. अनेक ठिकाणी भातलावणी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे शेतात भाताचे पीक तरारून आले आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने आंदरमावळातील धबधबे ओसंडून वाहत आहेत. निसर्गाचे हे रूप पाहण्याची पर्यटकांना या निमित्त पर्वणी मिळते. त्यात सलग चार दिवस सुट्या आल्या आहेत. त्यामुळे त्याचा आनंद घेण्यासाठी सर्वांनी आधीच त्याचे नियोजन केलेले आहे.
वर्षा विहाराचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी सलग जोडून येणाऱ्या सुट्यांमुळे नियोजन आधी एक महिने केले जाते. त्यानुसार सुट्ट्यांमधील रिसॉर्टचे बुकींग फुल्ल झाले आहे. सहकुटुंब, मित्र, नातेवाईक यांच्यासह पर्यटनाला जाण्याचा कल वाढत आहे. शहरातील धावपळीच्या जीवनातून वेळ काढून निसर्गाच्या सानिध्यात जाण्यास नागरिक पसंती देत आहे. लोणावळ्यातील भुशी धरण, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट, तुंगार्ली धरण, कार्ला लेणी, कैवल्य धाम, प्रतिपंढरपूर, प्रतिशिर्डी तसेच परिसरात लोहगड, विसापूर, राजमाची किल्ला, पवना धरण परिसरातील बुकींग फुल्ल झाले आहेत.
घरगुती जेवणाचा अस्वाद
मावळ परिसरात येणाऱ्या पर्यटकांना खास मावळातील चुलीवरील जेवणाचा अस्वाद घेता येतो. खास इंद्रायणी तांदळापासून बनवलेला भात, तांदळाची भाकरी, भरले वांगे, मासवडी या घरगुती जेवणाचा अस्वाद चाखायला मिळतो. घरगुती पण स्वादिष्ट जेवणाची चव पर्यटकांना चाखता येते. तसेच त्यानिमित्त स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होतो.
आंदर मावळ, नाणे मावळ
नाणे मावळातील कोंडेश्वर, वडिवळे धरण, शिरोता धरण, ढाक भहिरी हा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. तर, आंदर मावळात पर्वत रांगांवरील असंख्य वाहणारे धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. त्यामुळे केवळ धबधब्यांखाली भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी या परिसराला पसंती मिळते.
लोणावळा, खंडाळा परिसरातील रिसॉर्ट, हॉटेल्स आणि खासगी बंगल्यांचे बुकिंग 95 टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. करोनानंतर दोन वर्षांनी पर्यटकांना सुटीचा आनंद लुटता येणार आहे. त्यांच्यामुळे व्यावसायिकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. पर्यटक सर्वसुविधा आणि खाण्याची सोय याला महत्त्व देत आहेत. त्या दृष्टीने व्यावसायिक सुविधा पुरवतात.
– दत्ता पाळेकर, गोविंदा रिसॉर्ट, लोणावळा.