ओंकार दळवी
जामखेड – अडीच वर्ष कोमात असलेल्या कर्जत-जामखेड तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांना प्रा.राम शिंदे यांना मिळालेल्या आमदारकीमुळे ‘नवं चैतन्य’ निर्माण झाले आहे. ही अडीच वर्ष प्रा. शिंदेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी खूप अडचणीची गेली. अनेकवेळा संघर्षाला तोंड द्यावे लागले. सत्तेपुढे काहीच न चालल्याने गप्प बसावे लागले. पण आता आमदार झाल्याने अडीच वर्षांचा ‘वनवास’ संपल्याने ‘राम’ आता नवी उमेद घेऊन राजकीय रणांगणात उतरले आहेत.
कर्जत व जामखेड मतदारसंघाला दोन मात्तबर आमदार मिळाल्याने तालुक्यातील राजकारण यापुढे नवे वळण घेणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. विधानसभा निवडणुकीत आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्या 43 हजार मतांनी पराभव केल्यानंतर राम शिंदे यांना प्रचंड संर्घष करावा लागला होता. खरेतर शिंदे यांची आजवरच्या कारकिर्दीत कायमच चढ – उताराचे राहिले. सालकरी गड्याचा मुलगा ते मंत्री अशी भरारी घेतली होती.
मात्र या भरारीने त्यांचे पाय जमिनीवर राहिले नाहीत, अशीही भावना पक्षाचे कार्यकर्ते आणि त्यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात निर्माण झाली होती. पराभवाने त्याची जाणीव त्यांना करून दिली. मंत्रिपदाच्या काळात काही ठराविक पदाधिकार्यांच्या कोंडाळ्यातील त्यांचा वावर राहिला. पक्षाच्या कार्यकर्त्यांना, नागरिकांना भेटत नाहीत, अशा तक्रारी वाढू लागल्या. त्यांनी बांधलेल्या टोलेजंग बंगल्याची जोरदार चर्चा त्यावेळी झाली होती. बाहेरचा उमेदवार अशी संभावना करत राम शिंदे यांनी पवार कुटुंबातील रोहित पवार यांच्या उमेदवारीकडे दुर्लक्ष करणे भोवले. सन 2019 मध्ये रोहित पवारांसारख्या तरुणाकडून पराभव पत्करण्याची वेळ आली.
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी दोन्ही तालुक्यातील नागरिकांच्या जिव्हाळाच्या प्रश्नात हात घालून अनेक महत्वाचे कामे मार्गी लावण्याचा सपाटा लावण्याने भाजपतील अनेक नेत्यांनी वाहत्या पाण्यात हात धुऊन घेण्यासाठी भाजपची अर्थातच ‘राम शिंदे’ यांची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केले, तर काही नेत्यांचे प्रवेश करून घेण्यात आले. ज्या कार्यकर्त्यांना राम शिंदे यांनी मंत्रीपदी असताना सत्तेचे लोणी खाऊ घातले, त्यांनीही निष्ठावंत न राहता राम शिंदे यांना ‘राम राम’ केला. तब्बल अडीच वर्षांमध्ये भाजपतील दिगज्ज नेते यांनी साथ सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केले. तरीही प्रा. शिंदे यांनी संयम ठेवत संघर्षात दिवस काढले.
दरम्यान, राजकीय पडझडीत मात्र भाजपने त्यांच्याकडे पाठ फिरवली नाही. शिंदेंना पक्ष संघटनेत प्रदेश उपाध्यक्ष, कोअर कमिटी सदस्य या पदावर काम करण्याची संधी दिली. त्यामुळे कर्जत – जामखेडच्या राजकारणात शिंदेंच्या हातून एकेक संस्था आमदार रोहित पवारांकडे जात असताना राम शिंदे हे प्रदेशाच्या राजकारणात स्वतःचे राजकीय ‘वजन’ वाढविण्यात यशस्वी ठरले. राम शिंदे यांना विधान परिषद देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करून कर्जत-जामखेडमध्ये पक्षसंघटन अधिक मजबूत करण्याची जबाबदारी पक्षाने त्यांच्या खांद्यावर सोपविली आहे.
आता वेध मंत्रिपदाचे !
विधान परिषदेवर राम शिंदेंना आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांच्या स्वागताने कर्जत-जामखेड दणाणून सोडले होते. अडीच वर्षानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. एकीकडे भाजपच्या कार्यकर्त्यांना शिंदे यांना संधी मिळते याचा आनंद तर दुसरीकडे महाआघाडीचे सरकार अडचणीत येत असल्याचे चित्र निर्माण झाल्याने वेगळेच समाधान आहे. राज्यात सत्तांतर होणार आणि पुन्हा राम शिंदे यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार, असे वेध सध्या मतदारसंघाला लागले आहे.