आज देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. भारतीय चित्रपट उद्योगाने स्वावलंबनाची कास पकडून कसा आणि किती प्रवास केला, त्यात कोणते अडथळे आले, हे या निमित्ताने तपासून पाहायला हवे.
भारतीय चित्रपटांच्या प्रवासाचा विचार करण्यापूर्वी चित्रपटांविषयीच्या दोन वक्तव्यांचा विचार केला पाहिजे. पहिले वक्तव्य रशियाच्या क्रांतीचा नेता लेनिन यांचे असून, दुसरे महात्मा गांधींचे आहे. रशियन क्रांतीनंतर लेनिन म्हणाले होते, की आमच्यासाठी चित्रपट हा अन्य सर्व कलामाध्यमांपेक्षा अधिक महत्त्वपूर्ण आहे. चित्रपट केवळ लोकांचे मनोरंजन करतो असे नव्हे तर सामाजिक शिक्षण, संवाद प्रस्थापित करणे आणि आपल्या विशाल लोकसंख्येला एका सूत्रात बांधण्याचे कामही तो करतो.
रशियन क्रांतीनंतर दोनच वर्षांत लेनिन यांनी तेथील चित्रपट उद्योगाचे राष्ट्रीयीकरण करून तो उद्योग एका मंत्रालयाच्या अधिपत्याखाली आणला होता. त्यानंतर बरोबर दहा वर्षांनी भारतीय स्वातंत्र्ययुद्धाने जोर पकडला. गांधीजी हे या आंदोलनाचे सर्वमान्य नेते होते; परंतु चित्रपटांची ताकद गांधीजी त्यावेळी ओळखू शकले नाहीत. अर्थात, त्यानंतरही त्यांनी ती ओळखली नाही. गांधीजी सिनेमाला समाजाचा शत्रू मानत होते. परंतु लेनिन ते एक सामाजिक शिक्षणाचे माध्यम मानत होते. सिनेमाबद्दलचे दोन नेत्यांचे हे दोन टोकाचे विचार.
स्वातंत्र्यानंतरच्या भारतीय चित्रपटांपुढील आव्हानांचा विचार करण्यापूर्वी गांधीजींचे हे विचार लक्षात घेतले पाहिजेत. त्यावेळी परदेशी चित्रपट मोठ्या संख्येने भारतात येत होते ही गोष्ट खरीच आहे. त्या चित्रपटांचे प्रदर्शनही यशस्वीरीत्या होत असे. त्यातील अनेक चित्रपटांमधून नग्नता प्रदर्शित केली जात असे. परंतु अनेक भारतीय निर्माते त्यावेळी आपल्या पौराणिक कथा आणि संत-महात्म्यांवर आधारित चित्रपटनिर्मिती करीत होते, हेही खरे आहे. या चित्रपटांना बरेच यशही मिळाले.
1917 मध्ये दादासाहेब फाळके यांनी “लंकादहन’ नावाचा चित्रपट तयार केला होता. 1918 मध्ये श्रीनाथ पाटणकर यांनी “राम वनवास’ या नावाचा चित्रपट तयार केला होता. पाटणकर यांनी त्यानंतर सीता स्वयंवर, सती अंजनी आणि वैदेही जनक नावाचे चित्रपटही तयार केले होते. मूकपटांच्या काळात प्रत्येक वर्षी रामकथेवर आधारित चित्रपट तयार होत होते. यात अहिल्या उद्धार, श्रीराम जन्म, लव-कुश, राम-रावण युद्ध, सीता विवाह, सीता स्वयंवर आणि सीता हरण आदी प्रमुख चित्रपटांचा समावेश आहे.
बोलपटांच्या काळातही रामकथेवर आधारित अनेक चित्रपट तयार झाले. भरत मिलाप, रामराज्य, राम वाण आणि सीता स्वयंवर असे चित्रपट तयार झाले. चित्रपटांविषयी सरदार पटेल आणि नेहरू यांचे विचार गांधीजींपेक्षा भिन्न होते. गांधीजी हयात असतानाच पटेलांनी मुंबईच्या चित्रपट उद्योगाला भरपूर मदत करण्याचे आश्वासन दिले होते. अशी पार्श्वभूमी असतानासुद्धा भारतीय चित्रपट उद्योग निरंतर वाढत गेला आणि या क्षेत्रातील लोकांचा या माध्यमावरील विश्वास हेच त्यामागील कारण होते. 1948 मध्ये “चंद्रलेखा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मद्रासच्या जेमिनी स्टुडिओत तो तयार झाला होता. या भव्य चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी 30 लाख रुपये खर्च आला होता. वर्षभरात सुमारे दोन कोटी रुपयांचा व्यवसाय या चित्रपटाने केला. हिंदी चित्रपटांना यशाचा फॉर्म्युला याच चित्रपटाने दिला. एक नायिका आणि तिच्या प्रेमात पडलेले दोन नायक असे हे सूत्र नंतर अनेक निर्मात्यांनी स्वीकारले. अनेक वर्षे हा फॉर्म्युला चालला.
1950 च्या आसपास काही अशा घटना घडल्या. ज्यामुळे भारतीय चित्रपटांच्या स्वरूपावर बराच परिणाम झाला. 1949 मध्ये भारत सरकारने एस. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली. चित्रपट उद्योगाच्या परिस्थितीचे आकलन करणे आणि त्यात सुधारणा करण्यासाठी उपाययोजना सुचविणे, हे या समितीचे काम होते. 1951 मध्ये राज कपूर यांचा “आवारा’ चित्रपट प्रदर्शित झाला. देशविदेशात तो लोकप्रिय ठरला. त्यानंतर वर्षभरात 1952 मध्ये चार महानगरांमध्ये चित्रपट महोत्सवाचे आयोजन झाले. यात भारतीय चित्रपटांबरोबरच परदेशी चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले. भारतीय चित्रपटसृष्टीला जगभरातील कलात्मक चित्रपटांचा परिचय या महोत्सवामुळे झाला. जपान, रशिया, इंग्लंडमधून चित्रपट आले होते. या महोत्सवाने भारतीय चित्रपटांच्या प्रगतीची पायाभरणी केली.
स्वातंत्र्यापूर्वी ज्या स्टुडिओ व्यवस्थेची पायाभरणी झाली होती, ती आजही खूप यशस्वी ठरली आहे. चित्रपटनिर्मिती करणाऱ्या डझनाहून अधिक कंपन्या आज कोट्यवधींमध्ये, काही कंपन्या अब्जावधींमध्ये व्यवसाय करीत आहेत. स्टुडिओंच्या व्यावसायिकीकरणाचा विचार करता, त्याचा प्रारंभ स्वातंत्र्यापूर्वीच झाला होता. फेब्रुवारी 1934 मध्ये हिमांशु रॉय यांनी बॉम्बे टॉकीजसाठी 25 लाख रुपये उभे करण्याच्या दृष्टीने शंभर रुपयांचे 25 हजार शेअर्स जारी केले होते.
देविका राणी यांनी लिहिले आहे की, 1935 मध्ये आम्ही मुंबईच्या मालाडमध्ये जेव्हा बॉम्बे टॉकीजची स्थापना केली होती, तेव्हा तो एका व्यापाराप्रमाणे चालविला. आमच्या कंपनीकडे अद्ययावत उपकरणे होती. बेल अँड हावेल कंपनीचे कॅमेरे होते आणि आरसीए ध्वनियंत्रणा होती. यापूर्वीही चित्रपट कंपन्या चित्रपटांची निर्मिती करीत होत्या. परंतु हिमांशु रॉय यांनी त्याला एक नवीन आयाम दिला. आज भारतीय चित्रपट उद्योगजगतातील सर्वांत मोठ्या चित्रपट उद्योगांमध्ये समाविष्ट झाला आहे आणि तो निरंतर मजबूत होत चालला आहे.