मे महिना खरंतर नकोसा वाटतो. अंगाची लाही लाही होते. पंख्याची घरघर वाढते आहे. घामाच्या धारा वाहत आहेत. बर्फाची वरच्यावर वाफ होत आहे! उन्हाळ्याने जीव अगदी बेजार झाला आहे! मे महिना दरवर्षीच येतो नि जातो पण यंदा काही विलक्षणच वाटतंय!
आंब्याचा आला सीझन पण ते आहेत दोनशे रुपये डझन! जांभळाचा, करवंदांचा मे महिन्यातच येतो हंगाम. मुलांना हवा असतो त्यांचा मनसोक्त आस्वाद. पण पाकिटातल्या पैशानं सॉरी… सध्या मोबाइल पेमेंटने म्हटलेला असतो राम. कारण महागाईने सर्वांना घातलाय लगाम!
वसंत ऋतू म्हणजे प्रेमिकांचा स्वर्गच. म्हणूनच वाटतं मे महिन्यात विवाहांना येतो महापूर. जिकडे जावं तिकडे मंगल कार्ये. “पैशाच्या उन्हाळ्यात’ हा वसंत ऋतू साजरा करायचा आहे. अगदी जवळच्या नात्यांत कार्य म्हटले की केळवण आलंच. मेजवानी, आहेर मिळून हजार-पाच हजार धाव जातेच. लांबच्या संबंधात ओळखीत लग्नाला नि जेवायला बोलावले की कमीत कमी हजार तरी हवेतच. स्वागत समारंभाला तर बरेच ठिकाणी जाता जाता आपली अगदी पाचावर धारण बसते.
नवविवाहित धुंद फुंद होऊन उन्हातसुद्धा चांदणे फुलवीत असतात; पण माजी नवविवाहित म्हणजे आताचे संसारी गृहस्थ-गृहिणी चांदण्यातसुद्धा उन्हाचे चटके बसल्याप्रमाणे होरपळत असतात. कारण त्यांच्या मनात जरी भावनांचे चांदणे फुलत असले तरी जनात, व्यवहारात त्यांना टंचाई-महागाईच्या नि तुटपुंज्या मिळकतीच्या उन्हाने जीवघेणे चटके बसत असतात.
पोर्तुगीज भाषेत एक म्हण आहे, “जे फूल उन्हात उमलतं, ते कधीच कोमेजत नाही.’
“वेळ झाली भर माध्यान्ह
माथ्यावर तळपे ऊन’
“तप्त दिशा झाल्या चारी
भाजतसे सृष्टी सारी’
“वाहतात वारे जळते
पोळतात फुलत्या तनुते’
हा आहे कवितेतला उन्हाळा. प्रा. विश्वास वसेकर मे महिन्याबाबत लिहिताना कवी अनिल यांच्या कवितेचा दाखला देतात. ते म्हणतात, कवी अनिलांची कविता नागपूरच्या उन्हात रापलेली आहे. मे महिना म्हणजे “ग्रीष्माची नाजूक टोपली’ असे मे महिन्याचे वर्णन प्रा. वसेकर यांनी अलंकारिक भाषेत केले आहे.
असा आहे हा मे महिना! बालकांना तो परी राज्यातील स्वप्ननगरीच वाटतो. तर जीवनातील वसंत ऋतूने बहरलेल्या नव युवक-युवतींना तो वाटतो मोगऱ्याच्या मादक सुगंधाने धुंद झालेली गंधर्व नगरी. आणि त्यांना वाटतं बाराही महिने फक्त मे महिनाच असावा. पण संसारी स्त्री-पुरुषांना काय वाटतं मे महिन्याबद्दल? त्यांना हा मे महिना फक्त वैशाख वणवाच वाटतो! त्याच्या धगीने ते अगदी बेजार झालेले असतात. वर्षात मे महिना आलाच नाही तर किती छान होईल असं त्यांना सारखं वाटत असतं नि मृगाच्या मृदगंधाची ते मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. असा आहे या मे महिन्याचा अगाध महिमा.