मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कालच्या सभेत हल्लाबोल केला होता. त्यानंतर त्यांनी केलेल्या फटकेबाजीचा समाचार आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतला. फडणवीस वैफल्यग्रस्त झाले असल्याची टीका संजय राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेता यांना ब्रेक लागणे कठीण असते. अपघात अटळ आहे”, असे राऊत यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या सभेत देखील संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला होता. शिवसेना कोणापुढे वाकणार नाही, ना कोणापुढे झुकणार नाही. आम्ही संघर्ष करत राहू, लढत राहू. आम्हाला संघर्षाची सवय आहे. आजची सभा शंभर सभांची बाप आहे. आजची सभा हेच सांगते की, मुंबईचा बाप शिवसेना फक्त शिवसेना आहे. कोणाला पाहायचं असेल, आजमवायचं असेल तर मुंबईत या. मुंबईचा बाप शिवसेना असून आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.
उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेता यांना ब्रेक लागणे कठीण असते.
अपघात अटळ आहे.— Sanjay Raut (@rautsanjay61) May 16, 2022
“आम्हाला गर्दी जमवावी लागत नाही, आम्हाला गर्दी आणावी लागत नाही. हे राज्य, हा पक्ष हा पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानेच आणि बाळासाहेब ठाकरेंच्या प्रेरणेने चाललेलं आहे. काही लोक हे राज्य बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक प्रश्न निर्माण केलेत, काही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही जी पोटदुखी आहे, ही जी काही लोकांची जळजळ आहे” असे राऊत म्हणाले होते.
कालच्या भाषणात फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यांनी म्हटले होते की, उद्धव ठाकरे म्हणाले, मी पाय ठेवला असता तरी बाबरी ढाचा खाली आला असता, किती विश्वास आहे माझ्यावर त्यांचा. लपवायचं काय, आज माझं वजन 102 किलो आहे. जेव्हा बाबरी पाडायला गेलो, तेव्हा माझं वजन 158 किलो होते. उद्धव ठाकरे यांच्या भाषेत सांगायचं झालं तर, सामान्य माणसाचा एफएसआय जर एक असेल, तर माझं एफएसआय 1.5 आहे आणि बाबरी पडायला गेलो तेव्हा माझं एफएसआय 2.5 होता. उद्धव ठाकरे यांना असं वाटतं, माझ्या पाठीत खंजीर खुपसून माझं राजकीय वजन कमी होईल. मात्र हाच देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेचा ढाचा पाडणार, असे ते म्हणाले.