कोंढवा –महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांतील ओढ्या-नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. काही ठिकाणी ओढे खचले तर अनेक ठिकाणी अतिक्रमणे झालेली आहेत. या गोष्टीकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असून पावसाळ्यात या गावांत बहुतांशी ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे.
ग्रामपंचायतीकडून ओढ्यानाल्यांची सफाईचे काम होत होते. परंतु, पालिका प्रशासनाकडे कारभार गेल्यानंतर याकडे दुर्लक्ष होत आहे. यातून ओढ्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. आंबील ओढ्याच्या दुर्घटनेनंतरही पालिका प्रशासन नाले सफाईच्या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याने समाविष्ठ गावांत पूर स्थिती निर्माण झालेल्या याला पालिकेचे अधिकारी जबाबदार असतील, असा इशाराच या गावांचे आजी-माजी लोकप्रतिनिधी, नागरिकांनी दिला आहे.
पिसोळी, उंड्री, वडाचीवाडी, हांडेवाडी, होळकरवाडी, ऊरुळी देवाची, फुरसुंगी या भागांतील ओढ्यांची अवस्था खूपच बिकट झाली आहे. कचरा, दगड, माती व इतर टाकाऊ वस्तूंमुळे ओढे-नाले भरून गेले आहेत. पालिका प्रशासनाने तातडीने हालचाली करणे गरजेचे आहे. पिसोळी येथील पद्मावती माता मंदिरालगत असलेल्या ओढ्याची मोठी दुरवस्था झाली आहे. फुरसुंगी गावालगत वाहणाऱ्या नाल्याचीही अवस्था तशीच असून गेल्यावर्षी या ओढ्याला पूर येवून पाणी गावात शिरले होते. प्लॅस्टिक कचरा, टाकावू वस्तू अशी अवस्था ओढ्यांची झाली आहे. पावसात हा कचरा व दगड माती अडकून बसली तरी ओढ्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होऊन पाणी पात्राबाहेर येण्याचा धोका आहे. पूरस्थिती टाळायची असल्यास पालिका प्रशासनाने समाविष्ठ सर्वच गावांतील ओढे-नाले पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.