नगर -शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खाजगी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यंदा जिल्ह्यातील 400 शाळा पात्र ठरल्या आहेत. या शाळांतील एकूण प्रवेश क्षमतेच्या 25 टक्के म्हणजेत 3058 जागांवर मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात 2924 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. प्रवेश घेण्यासाठी 20 एप्रिलपर्यंत मुदत दिली होती. प्रत्यक्षात मात्र फक्त 902 विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे.
दरम्यान, आज बुधवारी प्रवेश घेण्यासाठी अंतिम मुदत आहे. मात्र, अजून निम्मेही प्रवेश झालेले नाहीत. त्यामुळे प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. शाळेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना एसएमएस पाठवले आहेत. प्रवेशासाठी 20 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
या काळात विद्यार्थ्यांच्या पालकांनी पडताळणी समितीमार्फत कागदपत्रांची पडताळणी करुन विद्यार्थ्यांचा शाळेतील प्रवेश निश्चित करायचा आहे. या शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे. तरी देखील अजून निम्मे सुद्धा प्रवेश झालेले नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत फक्त 902 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. आता तर प्रवेश घेण्यासाठी एकच दिवस राहिला आहे. त्यामुळे प्रवेश घेण्यासाठी आणखी मुदत मिळावी, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे. आता यावर शिक्षण विभाग काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
यंदा पहिल्या टप्प्यात 2924 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये अकोले 114, जामखेड 54, कर्जत 98, कोपरगाव 233, नगर मनपा 284, नगर 286, नेवासा 210, पारनेर 141, पाथर्डी 129, राहाता 381, राहुरी 261, संगमनेर 280, शेवगाव 183, श्रीगोंदा 83 आणि श्रीरामपूर तालुक्यात 187 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
==============