मुंबई : १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी दिलेल्या माहितीबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी १४ ट्विट्सच्या माध्यमांतून आरोप करत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या या ट्विटवर आणि उपस्थित केलेल्या प्रश्नावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीसांसह विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.
रोहित पवार यांनी आज सकाळी केलेल्या ट्वीटमध्ये शरद पवारांची एका वृत्तवाहिनीसाठी दिलेल्या मुलाखतीमधील एक क्लिप शेअर केली आहे. या क्लिपमध्ये पवारांना बॉम्बस्फोटाबाबत केलेल्या त्याच विधानाविषयी विचारणा करण्यात आल्यानंतर त्यांनी त्यावर खुलासा केला आहे. शरद पवारांनी त्यावेळी मुस्लिम बहुल भागात देखील एक स्फोट झाल्याची चुकीची माहिती दिली होती. यासंदर्भात विचारणा केली असता त्या दिवशी नेमके काय घडले होते, यावर पवारांनी खुलासा केला आहे.
‘पवार साहेब खोटं बोलले’, असा आरोप विरोधकांनी केला…
आम्ही म्हणतो हो बोलले!
पण ते का खोटं बोलले? हे अपप्रचार करणाऱ्यांना लोकांपासून लपवून ठेवायचंय!
खास त्यांच्यासाठी हा व्हिडिओ!@PawarSpeakshttps://t.co/9A8u05PWpq— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 18, 2022
पवारांची ही क्लिप शेअर करताना रोहित पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. “शरद पवार खोटं बोलले असा आरोप विरोधकांनी केला. आम्ही म्हणतो हो बोलले! पण ते का खोटं बोलले? हे अपप्रचार करणाऱ्या लोकांपासून लपवून ठेवायचंय! खास त्यांच्यासाठी हा व्हिडीओ”, असं रोहित पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
या क्लिपमध्ये, “बॉम्बस्फोट शुक्रवारी झाले. दुपारी १२च्या सुमारास. मी मंत्रालयात माझ्या कार्यालयात होतो. माझ्या कार्यालयापासून एअर इंडियाची बिल्डिंग अर्ध्या फर्लांगावर आहे. एअर इंडियाच्या तिथेच स्फोट झाले. माझ्या कार्यालयाच्या काचा हलायला लागल्या. माझ्या लक्षात आलं काहीतरी झालं. मी खिडकी उघडली तर तिथे धूर दिसायला लागला. मी कंट्रोल रुमला विचारलं तर बॉम्बस्फोट झाल्याचं समजलं. ५ मिनिटांत लागोपाठ इतर ठिकाणीही स्फोट झाल्याचं कळलं. मी स्पॉटवर जाऊन बघायचं ठरवलं. पण पोलीस आयुक्तांनी मला सांगितलं तुम्ही जागेवरून हलू नका, आम्ही स्पॉटवर जाऊन पाहातो”, असे शरद पवारांनी सांगितले.
“काही तासांनी मी एअर इंडियाच्या स्पॉटला गेलो. त्यात आरडीएक्सचं मटेरियल वापरलं होतं. आरडीएक्स तयार करणारा कारखाना फक्त देहूरोडला आहे. मी संबंधित विभागाला विचारणा केली. पण आपल्याकडे दोन वर्षांपासून आरडीएक्स बनत नाही आणि स्टॉकही नाही असं मला कळलं. अर्थात आरडीएक्स इथलं नाही हे मला समजलं. मला लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितलं की शेजारच्या देशात आरडीएक्स बनतं. त्यामुळे शेजारी देशातून आरडीएक्स आल्याची शक्यता होती. बॉम्बस्फोट झाल्याची ठिकाणं ही हिंदूंची लोकसंख्या असणारी होती. याचा अर्थ हा नियोजित कट असला पाहिजे.
भारतात हिंदू-मुस्लीम दंगल घडावी आणि मुंबई पेटलेली जगाला दिसावी असा त्यामागचा हेतू असावा असं मला वाटलं. त्यामुळे काहीही झालं तरी देशात हिंदू-मुस्लीम दंगा होता कामा नये म्हणून मी टीव्हीवर सांगताना मुस्लिम बहुल भागातही स्फोट झाल्याचं सांगितलं. त्यात मस्जिद बंदरचं खोटं नाव सांगितलं. मला सिग्नल द्यायचा होता की हे फक्त हिंदुंच्या नाही तर मुस्लिमांच्या भागातही घडलंय. बॉम्बस्फोटांमुळे हिंदू-मुस्लीम संघर्षाचं चित्र निर्माण होण्याची शक्यता होती. सुदैवाने ते झालं नाही”, असेदेखील शरद पवार या व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहेत.