कोलकाता – सीबीआय आणि ईडी सारख्या एजन्सी भाजपच्या मित्र यंत्रणा आहेत असा आरोप आसनसोल लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठीचे टीएमसीचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले असून भाजपचे सरकार हे हुकुमशाही सरकार आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
आपले पंतप्रधान मोदींशी वैयक्तिक काहीही मतभेद नाहीत पण त्यांच्या पक्षाशी जे राजकीय मतभेद आहेत ते दूर होणे शक्य नाही असेही त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. बंगालमध्ये आपण उपरे संबोधले जात आहात त्या विषयी तुमचे मत काय असे विचारता ते म्हणाले की आपण स्थानिक बंगाली नागरीकांपेक्षा कमी बंगाली नाही.
भाजपच्या संबंधात बोलताना ते म्हणाले की भाजप आता वाजपेयी यांनी बांधलेला पक्ष राहिलेला नाही. हा पक्ष आता एका हुकुमशाही संघटनेत रूपांतरीत झालेला पक्ष बनला आहे. आपले राजकीय हिशोब चुकते करण्यासाठी हा पक्ष ईडी आणि सीबीआयचा सर्रास दुरूपयोग करीत आहे. त्यामुळेच भाजपकडे आज मित्र पक्ष उरलेला नाही. त्यांचे एनडीएचे सारे मित्र पक्ष त्यांना सोडून गेले आहेत.
म्हणूनच राजकीय वातावरणात भाजप आज एकाकी पडला आहे. कॉंग्रेस सोडण्याचे नेमके कारण सांगणे मात्र त्यांनी टाळले. कधीकधी योग्य दिशेने जाण्यासाठी तुम्हाला नवीन दिशा स्वीकारावी लागते असे त्यांनी नमूद केले.