भदोही – कर्जमाफीच्या नावाखाली कॉंग्रेसने शेतकऱ्यांची दिशाभूल केली. त्या उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम-किसान सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नढ्ढा यांनी केला आहे. आज उत्तरप्रदेशाच्या अखेरच्या टप्प्यात येथे घेण्यात आलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. ते म्हणाले की, आज अनेक लोक स्वत:ला शेतकरी नेते म्हणवतात, पण त्यांनी समाजासाठी आणि शेतकऱ्यांसाठीही काहीही केले नाही.
जेव्हा पंतप्रधानांनी जन धन योजना सुरू केली तेव्हा विरोधकांनी तिची खिल्ली उडवली. अखिलेश चांदीचा चमचा घेऊन जन्माला आले त्यांनीही या योजनेची थट्टा केली. राहुल गांधी यांनी गरिबांच्या बॅंक खात्यांचे काय होणार? अशी शंका व्यक्त केली होती.
पण आज, पीएम-किसान सन्मान निधी, पंतप्रधान आवास योजना आणि इतर योजनांतर्गत दिलेला पैसा थेट गरिबांच्या बॅंक खात्यात जातो आणि तेथे कोणतेही मध्यस्थ नाहीत असे त्यांनी निदर्शनाला आणून दिले. केवळ भाजपने समाजातील गरीब, दलित, वंचित, शोषित, महिला, शेतकरी आणि तरुणांना मुख्य प्रवाहात आणले, असा दावाही नढ्ढांनी व्यक्त केला. समाजवादी पक्षाच्या सरकारने केवळ शस्त्रांस्त्रांचे कारखाने उघडणारे माफिया आणि गुंडांना राजाश्रय देण्याचे काम केले असा आरोपही त्यांनी केला.