भर उन्हाळ्याचे दिवस! मेणच काय तर माणूसही वितळेल अशी टळटळीत दुपार आणि त्यात भर म्हणून लाल परीचा प्रवास! अंगातून घामाच्या धारा लागलेल्या आणि अंगासोबत मनाचीही तलखी करणारं ते घामट वातावरण! त्यातल्या त्यात सुखाची बाब म्हणजे खडखडणाऱ्या त्या एसटीमध्ये मला खिडकी शेजारची जागा मिळाली होती.
धुरळ्याचे लोट उडवत आमची ती बस मधल्या एका थांब्यावर विसावली आणि खिडकीतून दिसणाऱ्या दृश्यानं मन अक्षरशः विषण्ण झालं. त्या तसल्या उन्हात बसून दगड फोडता फोडता धपापलेली एक कोवळी माता आपल्या लोण्याहूनही कोवळ्या लेकराला पदराखालचे अमृत पाजत होती. क्षणार्धात कुण्या एका जातिवंत कवीच्या त्या ओळी आठवल्या.
छिन्नी खालचा दगड फुटता फुटेना,
स्तनाला चिकटलेले मूल सुटता सुटेना,
बाई फोडतच राहिली
बाई फुटतच राहिली
किती अंतर्मुख करणारे शब्द आहेत. काळजाचा ठाव घेण्यापेक्षा काळजावरचे अजूनही ठसठसणारे घाव पुन्हा नव्यानं जागृत करणारे.
आज, या एकविसाव्या शतकातही “स्त्री’ काचेचं भांडच समजली जाते आणि आजही ती फुटतेच आहे. कधी पुरुषप्रधान संस्कृतीच्या वरवंट्याखाली तर कधी स्त्री-पुरुष असमानतेच्या रेट्याखाली. तिचं बाईपण जणू काही फोडून घेण्यासाठीच आहे.
कित्येक शतकांपासून स्त्री रडत-कुढत राहिली. अनेक शतकांचा अंधार अंगावर पांघरूण काळोखाच्या गर्तेत खोल पडून राहिली. अनेक रुढी परंपरांच्या पैंजणरूपी बेड्या तिच्या पायांमध्ये अडकवून तिला वैभव प्रदर्शनाची आणि सुखोपभोगाची वस्तू ठरविण्यात आलं. चार भिंतीत कोंडलेली स्त्री “त्यागाची मूर्ती आणि सहनशीलतेचा पुतळा’ होऊन बसली. अर्थात ती तशी झाली नाही, तिला तसंच घडविण्यात आलं. “लज्जा’ हाच स्त्रीचा दागिना आणि “अश्रू’ हेच स्त्रीचं शस्त्र, हेच शास्त्र तिच्या रोमारोमात भिनवण्यात आलं.
पूर्वी स्त्रीला वेलीची उपमा दिली जात असे. वेल जशी वृक्षाच्या आधाराशिवाय उभी राहू शकत नाही तशी स्त्रीही पुरुषाच्या बळकट खांद्याशिवाय तग धरू शकत नाही हे ठसवणं, हा त्यामागचा गर्भितार्थ. सावित्रीबाई फुले नावाची पहिली स्त्री शिक्षिका जन्माला आली आणि तांबडं फुटलं. शतकांचा अंधार हळूहळू मागे हटू लागला. वाड्यांच्या भिंतीआड अंधाऱ्या खोलीत तर कधी ताट्या-झोपड्यांच्या कुंपणाआड कोंडली गेलेली स्त्री दबकत-दबकत का होईना पण बाहेर पडण्याचं धाडस दाखवू लागली.
शिक्षण, नोकरी, निर्णयस्वातंत्र्य या गोष्टींमुळे ती हळूहळू स्वयंपूर्णतेकडे चालू लागली. बालपणी पिता, तरुणपणी पती आणि वृद्धपणी पुत्र यांच्या आधाराशिवाय स्त्री जीवनसागर तरून जाऊ शकत नाही, या भ्रामक समजुतींवर मात करून पुरुषप्रधान संस्कृतीने व्यापलेली सारी क्षेत्रे हळूहळू पादाक्रांत करू लागली.
स्वयंपाकघरातल्या रवीपासून अलिशान गाडीच्या चावीपर्यंत, चुलीजवळच्या पळी-विळीपासून प्रयोगशाळेतल्या परीक्षानळीपर्यंत,”चूल-मूल’ पासून “भूल’तज्ज्ञ होऊन शस्त्रक्रिया करून घेणाऱ्यांच्या वेदनांना भूल देणारी स्त्री आता सर्वव्यापी झालीय. पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, पहिली महिला शास्त्रज्ञ कमला सोहोनी, अवकाशात झेप घेणाऱ्या कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, नर्मदा बचाव आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मेधा पाटकर, आदिवासींसाठी झटणाऱ्या साधना आमटे, बुकर पारितोषिक मिळवणाऱ्या अरुंधती रॉय, तिहार जेलचे नंदनवन बनविणाऱ्या किरण बेदी या सर्व स्त्रियांनी परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली आणि मुहूर्तमेढीनंतरचा उत्सव सुंदरच होतो. या सर्व स्त्रियांच्या कर्तृत्वाकडे पाहिलं की अजूनही “स्त्री’च्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्या पुरुषजातीपुढे नवा प्रश्न ठेवावासा वाटतो, तो म्हणजे “स्त्री दुर्बल कशी?’
स्त्री दुर्बल नाही पण तिला दुर्बल ठरवणं, हे पुरुषप्रधान संस्कृतीचं षड्यंत्र असावं असा विचार झटकन मनाला शिवून जातो. यापेक्षाही मोठी वेदना म्हणजे स्त्रीलाही स्त्री नको आहे. आजच्या “स्त्री-पुरुष समानतेच्या’ आणि “स्त्री मुक्ती’चा नारा देणाऱ्या शतकातदेखील “वंशाला दिवाच हवा’ या हव्यासापोटी आर्थिक-शारीरिकदृष्ट्या झेपत नसतानाही अनेक मुलं जन्माला घालणाऱ्या, “दिवाच हवा’ म्हणत “वंशाची पणती’ नाकारणाऱ्या कितीतरी स्त्रिया खेडोपाडी स्त्रीभ्रूणहत्येचं भयाण पाप सहजपणे पचवतात. त्यात त्यांना काही गैर वाटत नाही आणि केलेल्या गुन्ह्याचं वैषम्य वाटण्याइतकं समाजभानही त्यांना नाही.
मुलगा अथवा मुलगी, कशाला करता खात्री?
मुलीच्या जन्माला, का लावता कात्री?
कित्येक पुरुष सुखी संसाराची केवळ स्वप्ने पाहत लग्नाचं वय मागे टाकत आहेत. पत्नी म्हणून “स्त्री’ची गरज असणाऱ्या कित्येक पुरुषांना कन्या म्हणून तिची जबाबदारी घेणं अवघड वाटतं. अर्थात या अपवादांमुळे आई, पत्नी, कन्या आणि आयुष्यातल्या इतर स्त्रियांवर भरभरून प्रेम करणाऱ्या, त्यांच्याबद्दल आदर बाळगणाऱ्या कित्येक पुरुषांबद्दलचं कौतुक यत्किंचितही कमी होणार नाही. हजारो-लाखो रुपये कमावणाऱ्या स्त्रियांच्या एटीएम कार्डचा पासवर्ड त्यांच्या नवऱ्यांनाच पाठ!
कवयित्री स्फूर्ती तिच्या एका कवितेत म्हणते,
मुलगी नाही सुरक्षित, अन् नाही सुरक्षित आई,
भले समानतेच्या जगातही, भय इथले संपत नाही!
निर्भया प्रकरण असो वा अजून कुठलं… “स्त्री’ला अजूनही अभय नाही. केवळ स्त्री-पुरुष समानतेचे नारे देऊन भागणार नाही तर त्यासाठी समस्त पुरुष वर्गाची मानसिकता बदलायला हवी. मुळातच स्त्री प्रबळ आहे. पुरुषापेक्षा ती अधिक ताकदवान आहे. म्हणूनच बाळाला नऊ महिने उदरात बाळगून त्याचे संगोपन करण्याची नाजूक आणि तरीही प्रचंड मोठी जबाबदारी निसर्गाने स्त्रीच्या ओटीत घातली. मातृत्वाचं हे भगिरथव्रत अंगाखांद्यावर लीलया पेलणारी ती स्त्री अबला कशी असेल?
मुक्ताई म्हणतात-
मुंगी उडाली आकाशी, तिने गिळीले सूर्यासी!
पुरुषाने आभाळाएवढं व्हावं आणि सूर्यालाही गिळू पाहणाऱ्या स्त्रीची त्याने साथसोबत करावी. तिला तिच्या मनाप्रमाणं रुजू, बहरू-फुलू द्यावं… रुजणं-फुलणं-बहरणं हे नैसर्गिक सत्य आहे. या सत्यापासून तिला वंचित करू नका. तिला हसत-खेळत-आनंदात जगू द्या.
– प्रज्ञा जोशी-कुलकर्णी