पिंपरी -मागील वर्षी पवना धरण क्षेत्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला असतानाही शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नुकतेच पूर्ण शहरभर दररोज पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहे. त्यानंतरही शहरातील विविध भागात अद्यापही टॅंकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे.
नागरिकांना पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहेत, याविरोधात आज (गुरूवार) शहर कॉंग्रेसच्या वतीने महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात येत आहे. याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात कॉंग्रेसने म्हटले आहे की, शहरातील नागरिकांना नोव्हेंबर 2019 पासून दिवसआड पाणी पुरवठा सुरू आहे.
शहरातील दाट वस्ती व झोपडपट्ट्यांमधील कमी दाबाने व अनियमितपणे पाणी पुरवठा होत आहे. शहरातील विविध भागातून गेल्या सव्वा चार महिन्यात 1 हजार 344 पाण्याच्या तक्रारी आल्या आहेत. दररोज पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करावा या मागणीसाठी आज (गुरुवार) सकाळी 11 वाजता पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी दिली आहे.