पवनानगर -पवना धरणात 58.46 टक्के इतका पाणी साठा सध्या शिल्लक आहे. मावळसह पिंपरी चिंचवड शहराचा पाण्याचा मुख्य स्रोत म्हणून या धरणाकडे पाहिले जाते. धरणाची पाणी साठवण क्षमता 8.51 टीएमसी आहे. पवना धरणाची पाणी पातळी 4995.80 दशलक्ष घनफूट असून सध्या पवना धरणात 4976.80 दशलक्ष घनफूट इतका उपयुक्त पाणीसाठा आहे.
मागील वर्षी आज आखेर 64.43 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पवनाधरणात 6 टक्क्यांनी पाणीसाठा कमी झाला आहे. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने सप्टेंबरमध्येच पवना धरण 100 टक्के भरले होते. यावर्षी 1 जूनपासून आजअखेर 2716 मीमी एवढा पाऊस झाला आहे.
मावळ आणि पिंपरी चिंचवडकरांनी पाण्याचा जपून वापर करणे आवश्यक आहे. अजून उन्हाळ्याला सुरुवात होत आहे. दुपारी उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. परंतु पुढे मार्च, एप्रिल, मे आणि जून महिना बाकी आहे. मागील काही वर्षांचा मान्सून आगमनाची परिस्थिती पाहिली असता यावर्षी मान्सूनचे आगमन वेळेत झाले नाही तर मावळासह शहरवासीयांवर पाणी टंचाईचे संकट निर्माण होऊ शकते. त्यामुळे पाण्याचा पावर जपून करणे आवश्यक आहे, अशी माहिती पवना पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
पवना धरणात 58.46 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा साधारणतः जून अखेरपर्यंत पुरेल. त्यामुळे पाऊस वेळेत पडला नाही तर पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा.
– अनवर तांबोळी, स्थापत्य अभियांत्रिकी साहायक, पवना धरण.