नवी दिल्ली – भारतातील निम्न मध्यमवर्ग तुलनात्मकदृष्ट्या गरीब आहे. त्यांच्याकडे सरासरी 7,23,830 रुपये मूल्य असेल एवढीच संपत्ती असते. भारतात गरीबी मोठ्या प्रमाणावर आहे आणि अतिशय असमानता आहे असे वर्ल्ड इनइक्वालिटी लॅब या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे. देशातील एकूण संपत्तीचा विचार केला तर तळातील निम्म्या लोकांकडे जवळपास काहीच संपत्ती नसल्याचा दावा या अहवालात करण्यात आलेला आहे.
फ्रान्समधील ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ थॉमस पिकेटी यांनी हा अहवाल तयार केला आहे. 2021 मध्ये भारतातील सर्वाधिक श्रीमंत एक टक्के लोकांनी एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील वीस टक्के कमाई केली होती. तळातील निम्म्या लोकांची एकत्रित कमाई राष्ट्रीय उत्पन्नातील फक्त 13 टक्के एवढी होती. भारतातील प्रौढ व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 7,400 युरो किंवा 2,04,200 रुपये एवढे आहे. तळातील 50 टक्के लोकांचे वार्षिक उत्पन्न जेमतेम 2000 युरो किंवा 53,610 रुपये एवढे असते. त्याउलट उच्च उत्पन्न वर्गातील लोकांचे वार्षिक उत्पन्न 42,500 युरो किंवा 1,166,520 रुपये एवढे असते असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मोजके अतिश्रीमंत आणि मग मोठ्या संख्येने गरीब अशी मोठी विषमता भारतात असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
वर्ल्ड इनइक्वालिटी लॅबने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतातील कुटुंबांची सरासरी एकूण संपत्ती 35,000 युरो किंवा 9,83,010 रुपये एवढी असते. तळातील पन्नास टक्के कुटुंबांकडे संपत्ती जवळपास नसतेच. त्यांच्याकडील संपत्तीचे मूल्य साधारणपणे 4,200 युरो किंवा 66,280 रुपये एवढे असते.