नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवे तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर केंद्र सरकारने कायदे मागे घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र शेतकरी आपल्या काही मागण्यांवरून आंदोलनावर ठाम असल्याचे दिसत आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या मृत्यूला सरकारला जबाबदार धरण्यात येत असतानाच भाजपच्याच एका नेत्याने या सर्व मृत्याला शेतकरी नेते राकेश टिकैत यांना जबाबदार धरले आहे.
राजधानी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या 700 शेतकऱ्यांच्या मृत्यूला राकेश टिकैत जबाबादर असल्याचे वक्तव्य भाजप नेते हरिनारायण राजभर यांनी केले आहे. कृषी कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीमध्ये शेतकरी मागील वर्षभरापासून आंदोलन करत आहे.
सरकारने कृषी कायदे मागे घेतले आहेत, पण शेतकरी एमएसपी कायद्यावर ठाम आहेत. शेतकऱ्यांनी आंदोलन अद्याप मागे घेतलेले नाही, अशातच भाजप नेत्याच्या वक्तव्याने पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशमधील भाजपचे माजी खासदार हरिनारायण राजभरयांनी भारतीय किसान यूनियनचे नेता राकेश टिकैत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. तीन कृषी कायद्याविरोधात आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या सातशे शेतकऱ्यांच्या मृत्यूला राकेश टिकैत यांना जबाबदार मानलं आहे. यासोबत राकेश टिकैत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन संपत्ती जप्त करण्याची मागणी केली आहे. राजभर यांनी आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांना अतिरेकी असेही म्हटले आहे.
तीन कृषी कायदे मागे घेण्यात आले आहेत. मात्र, याचा शेतकऱ्यांना तोटा होणार आहे. कृषी कायदे रद्द झाल्याचा फायदा खलिस्तानी गुंडांना होणार आहे, असे वक्तव्य हरिनारायण राजभर यांनी केले आहे. सरकारच्या मवाळ भुमिकेचा शेतकरी नेत्यांनीच फायदा घेतला आहे. दिल्लीतील आंदोलक हे शेतकरी नाहीत, असेही राजभर यावेळी म्हणाले.