मुंबई – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा दोन दिवसीय महाराष्ट्र दौरा चांगलाच गाजला. बॅनर्जी यांनी मुंबई येथे अनेक गाठीभेटी घेतल्या. बॅनर्जी यांच्या दौऱ्यावरून टीका करताना महाराष्ट्रात विरोधीपक्ष असलेल्या भाजपने त्यांचा दौरा हा राज्यातील उद्योग, व्यवसाय बंगालला घेऊन जाण्यासाठी असून याकामी त्यांना शिवसेना मदत करत असल्याचा आरोप लगावला. भाजपने मित्रपक्ष शिवसेनेवर केलेल्या आरोपांबाबत आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.
काय म्हणाले अजित पवार?
पत्रकारांनी उपमुख्यमंत्री पवार यांना भाजपने ममता बॅनर्जी यांचा दौरा व शिवसेनेवर केलेल्या आरोपांबाबत विचारला असता त्यांनी, “मला एक कळत नाही, इतर राज्यातील मुख्यमंत्री आले म्हणजे ते उद्योगधंदे पळवायला आले हा अर्थ कसा काय निघतो?” असा प्रतिप्रश्न केला.
“उद्योगपतींना जिथं जिथं कामगार, जागा, पाणी, वीज, रस्ते या पायाभूत सुविधा मिळतात तिथं ते जाण्याचा प्रयत्न करतात. काहीजण रेड कार्पेट टाकतात, अतिरिक्त सवलती देतात.” असं सांगत पवार यांनी भाजपच्या आरोपांमध्ये काहीएक तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं.
संजय राऊत यांनीही सुनावलं
ममता बॅनर्जींच्या दौऱ्यावरून शिवसेनेवर प्रहार करणाऱ्या भाजपला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गुजरातच्या तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यांची आठवण करून दिली. तसेच बॅनर्जींच्या दौऱ्यावरच प्रशा का? असा प्रतिसवालही केला.
राजकीय आरोप-प्रत्यारोपांची मालिका कायम
यावर्षी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यासाठी आले असता ते मुंबईतील बॉलिवूड उत्तर प्रदेशाला घेऊन जाण्याचे प्रयत्न करीत असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला होता. त्यावेळी या आरोपांचे खंडन करताना भाजप नेते पुढे सरसावले होते.
ममता बॅनर्जी यांच्या दौऱ्यावेळी याउलट चित्र दिसत असून भाजप नेते बॅनर्जी या येथील उद्योग, व्यवसाय बंगालला घेऊन जाण्यासाठी आल्या असल्याचा आरोप करतायेत तर महाविकास आघाडीतील नेते हे आरोप बिनबुडाचे असल्याचं सांगतायेत.