पुसेगाव (प्रतिनिधी) – खटाव व परिसरात बुधवारी रात्री अचानक हजेरी लावलेल्या पावसात हुसेनपूर शिवारात रामचंद्र चव्हाण या मेंढपाळाची ४० मेंढरं पावसात गारठून मरण पावल्याने संपूर्ण मेंढपाळांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की लोणी (ता. खटाव ) येथील श्रीमंत शिंदे यांच्या हुसेनपूर येथील शेतात चव्हाण व त्यांच्या मावस भावाने गेले सहा दिवस कराराने मेंढरे बसवली होती. काल अचानक रात्रीच्या वेळी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने मेंढरं सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यासाठी त्यांची तारांबळ उडाली.
मात्र,अंधार पडल्याने व चिखल झाल्याने त्यांना मर्यादा आल्या. परिणामी ४० मेंढरे काकडून ठार झाली तर काही अत्यवस्थ स्थितीत आहेत. एकदम ४० मेंढरे दगवल्याने चव्हाण कुटुंबीयांवर आकाश कोसळले आहे.
शासनाने या घटनेची माहिती घेऊन त्वरित पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी विनंती चव्हाण दाम्पत्यांनी केली आहे.