नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कृषी कायदे मागे घेतले. केंद्र सरकारचा हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. यावेळी पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत करत त्यांनी केंद्र सरकारला चांगलेच सुनावले आहे.
शेतकऱ्यांचा एक वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष फळाला आला. आता भाजपचा पराजयच देशाचा विजय असेल, अशी जहरी टीका त्यांनी केला. केंद्र सरकारने मोठ्या उत्साहात कृषी कायदे लागू केले. मात्र, राजकीय विरोधासोबतच शेतकऱ्यांनीही आंदोलनाचे हत्यार उपसले. चर्चा ते दडपशाही सारे मार्ग अवलंबल्यानंतर अखेर हे कृषी कायदे मागे घ्यावे लागले. त्याचा भाजपला जोरदार धक्का बसला असून, गलितगात्र झालेल्या काँग्रेसला मात्र त्यामुळे संजीवनी मिळाली आहे. दरम्यान, यावेळी त्यांनी मोदी सरकारला अतिशय कोंडीत टाकणारे प्रश्न यावेळी विचारले.
सुरजेवाला यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप सरकार आणि मोदींना चोहोबाजूंनी घेरले. ते म्हणाले की, शेतकऱ्यांनी काळ्या कृषी कायद्यांविरोधात मोदी सरकारविरोधात याचिका दाखल केल्या. मात्र, सरकारकडून फक्त यातना मिळाल्या. मोदी सरकारने शेतकऱ्यांना लाठीहल्ला करायला लावला. दिल्लीच्या सीमा खोदून ठेवल्या. शेतकऱ्यांचे डोके फोडण्याचे आदेश देण्यात आले. इतकेच नाही, तर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आतंकवादी, नक्षलवादी आणि आंदोलनजीवी म्हटले गेले, असा घणाघात त्यांनी केला.
सुरजेवाला पुढे म्हणाले की, कृषी कायद्याविरोधात गेल्या वर्षभरापासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात आतापर्यंत 700 शेतकरी शहीद झाल्याचा दावा त्यांनी केला. उत्तर प्रदेशातील लखीपूर खीरी येथे गृहराज्य मंत्र्याच्या मुलाने आपल्या मित्रांसोबत मिळून शेतकऱ्यांना गाडीने चिरडले. हे अतिशय भयंकर होते. मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेऊन आज आपला गुन्हा कबूल केला आहे. आता मोदी सरकारला काय शिक्षा द्यायची, हे ठरवण्याची वेळ आली आहे, अशी जहरी टीका त्यांनी केली.
सुरजेवाला म्हणाले, भाजपला आता जळी, काष्ठी आणि पाषाणी निवडणुका दिसत आहेत. उत्तर प्रदेश, पंजाबसह पुढील वर्षी पाच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पराजय होण्याची भीती सतावते आहे. त्यामुळेच कृषी कायदे मागे घेतले आहेत. हाच मोदी आणि मोदी सरकारचा सपशेल पराजय आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला.