गडचिरोली : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत कोटगुल-ग्यारापत्ती जंगल परिसरात ‘सी-६०’ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस नक्षलवादी चकमकीत देशातला सर्वात टॉपचा नक्षल कमांडर आणि 50 लाखांचे बक्षिस असलेला मिलिंद तेलतुंबडे उर्फ सह्याद्री चकमकीत खात्मा करण्यात आला आहे. पोलिसांकडून याबाबत पुष्टी करण्यात आली आहे.चकमकीत तीन पोलीस गंभीर जखमी झाले असून त्यांना हेलिकॉप्टरने नागपूर येथे हलवण्यात आले आहे.
शनिवारी झालेल्या नक्षल चकमकीत गडचिरोली पोलिसांनी तब्बल 26 नक्षल्यांना कंठस्नान घातल्यानंतर त्या भागात सर्चिंग ऑपरेशन दरम्यान 29 अत्याधुनिक शत्रसाठा आणि मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य, 26 नक्षल्यांचे शव रात्री उशिरा कोटकल पोलीस मदत केंद्रात पोहोचवण्यात आले.
दरम्यान मारल्या गेलेल्या नक्षल्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. काल चकमकीनंतर शोध अभियानात रात्र झाल्याने घटनास्थळी शोधमोहीम थांबविण्यात आली होती. मात्र आज सकाळपासून परत एकदा या भागात शोध मोहीम राबवली जात आहे. या कारवाईत पोलिस दलाचे तीन जवान जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशंसा केली आहे.
मिलिंद तेलतुंबडे हा कुख्यात माओवादी नेता होता. गेल्या अनेक वर्षांपासून तो भूमिगत होता. तेलतुंबडे मूळचा महाराष्ट्रातील असून यवतमाळ जिल्ह्यातील राजूर गावचा रहिवासी होता. ३२ वर्षांपूर्वी त्याने चंद्रपूरला अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेतून कामाला सुरुवात केली होती. ‘वेकोलि’ कंपनीच्या अधिकाऱ्याच्या खुनानंतर तो बेपत्ता झाला. तो नक्षलींच्या केंद्रीय समितीचा सदस्य तसेच महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगड क्षेत्रीय समितीचा प्रमुख म्हणून कार्यरत होता. कॉम्रेड एम, दीपक, सह्याद्री अशा वेगवेगळ्या नावांनी नक्षलवाद्यांमध्ये त्याची ओळख होती.
कोरेगाव भीमा प्रकरणात अटकेत असलेल्या आनंद तेलतुंबडे यांचा मिलिंद तेलतुंबडे भाऊ आहे. भिमा-कोरेगाव हिंसाचाराचा सूत्रधार अशी पोलिसांत त्याची नोंद आहे. १ मे २०१९ रोजी गडचिरोलीत कुरखेडा – जांभुळखेडाज पोलिसांवर झालेल्या हल्ल्यामागे मिलिंद तेलतुंबडेचा हात असल्याचा संशय होता. त्याच्यावर ५० लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
नक्षलवादी चळवळ शहरी भागात रुजवण्यात त्याचा हात होता. केंद्र सरकारच्या मोस्ट वॉण्टेड नक्षलवाद्यांच्या यादीत त्याचा सहभाग होता. त्याच्यावर हत्या देशद्रोहासह अनेक गुन्हे दाखल होते.