अमरावती: राज्यातील अमरावतीमध्ये पुकारलेल्या ‘बंद’ला हिंसक वळण लागले. या घटनेनंतर शहरात संचारबंदी लागू करण्यात आला आहे. तसेच पुढचे तीन दिवस इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. शहर पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी याबाबत माहिती दिली. तसेच वैद्यकीय कारणाशिवाय कोणालाही घराबाहेर न पडण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत.
शहर पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी सांगितले की, हिंसाचाराला चिथावणी देणार्या अफवा पसरू नयेत म्हणून इंटरनेट सेवा तीन दिवस बंद ठेवली जाईल. अमरावतीतील राजकमल चौक परिसरात शनिवारी सकाळी शेकडो लोक बाहेर पडले आणि अनेकांनी भगवे झेंडे हातात घेतले होते.
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की जमावात उपस्थित काही लोकांनी राजमकाल चौक आणि इतर ठिकाणी दगडफेक केली, त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या दगडफेकीच्या घटनांनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अतिरिक्त पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 (1), (2), (3) अन्वये शहरात संचारबंदी लागू केली.
संचारबंदी कालावधीत कोणीही व्यक्ती वैद्यकीय कारण वगळता इतर कारणासाठी घराबाहेर पडणार नाही. तसेच, पाचपेक्षा जास्त इसम एकत्रित जमणार नाही, तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवा प्रसारित करू नये. तसेच या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल. हा आदेश आजपासून संपूर्ण अमरावती शहरासाठी पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे.