लखनौ – पुढील वर्षी पाच राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी वाराणसीतील पक्षाशी संबंधित बैठकीत पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना मोठे विधान केले. समाजवादी पार्टी, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आले तरीही भाजपचा पराभव करू शकत नाहीत असे त्यांनी म्हंटले आहे. तसेच करोनाकाळात कायदा, सुव्यवस्था, माफियांविरुद्ध कारवाई, आरोग्य सेवा व्यवस्थापनासाठी योगी आदित्यनाथ सरकारचे कौतुक केले आहे. या बैठकीला 403 विधानसभा क्षेत्रांचे प्रभारी, जिल्हा व प्रादेशिक नेते उपस्थित होते.
– 2024 साठी यूपीची निवडणुक महत्त्वाची
अमित शहा म्हणाले, 2022 च्या उत्तर प्रदेश निवडणुकीचे निकाल 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. सर्वांच्या नजरा उत्तर प्रदेशकडे आहेत, कारण दिल्लीतील विजयाचा रस्ता याच राज्यातून जातो. 2017 च्या निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांनी विधानसभेच्या 325 जागा जिंकल्या होत्या. यावेळीही मोठ्या प्रमाणात जागा जिंकून सत्ता कायम ठेवायची असल्याचे सांगत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी तयारीला लागण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
– 300 हून अधिक जागा जिंकण्याच्या रणनीतीवर चर्चा
यावेळी अमित शहा यांनी मतदारसंघांच्या प्रभारींशीही चर्चा करून संघटनात्मक कामांबाबत त्यांचे मत जाणून घेतले. पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपवावी, निवडणुकीची घोषणा होणे बाकी असले तरी प्रभारींना त्यांच्या नेमलेल्या मतदारसंघात काम सुरू करण्यास शहा यांनी सांगितले आहे.
– अखिलेश यादव यांच्यावर निशाणा
यावेळी त्यांनी मोहम्मद अली जिना यांच्याबद्दलच्या वक्तव्यावरून सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला. जिना यांची सरदार पटेल यांच्याशी तुलना करून अखिलेश यांनी गांभीर्याचा अभाव दाखवला असल्याचे ते म्हणाले. बसपा आणि काँग्रेस कमकुवत असून, तिन्ही पक्ष एकत्र आले तरी ते भाजपला हरवू शकत नाहीत, असेही ते म्हणाले. तसेच बैठकीला उपस्थित असलेल्यांना ‘बूथ जिंकले तर यूपी जिंकली’ अशी शपथ घेण्यास शहा यांनी सांगितले. निवडणुकीत 300 हून अधिक जागा जिंकण्याच्या रणनीतीवर त्यांनी चर्चा केली. कार्यकर्त्यांच्या बळावर आणि जनतेच्या आशीर्वादावर भाजप निवडणूक जिंकणार असल्याचे ते म्हणाले.
यादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही उपस्थितांना संबोधित केले. अमित शहा यांनी आज मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्यासमवेत आझमगडमध्ये राज्य विद्यापीठाची पायाभरणी केली.