मुंबई :- त्रिपुरा राज्यात मुस्लीम समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आयोजित मोर्चाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. सध्या या भागांमधील परिस्थिती नियंत्रणात असली तरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षानेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे. तर काँग्रेसकडून या हिंसेसाठी भाजपच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रातील हिंसेसाठी भाजपला जबाबदार धरलं आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. दंगली पेटवून निवडणुकीत फायदा घेण्याचा भाजपचा डाव असल्याचं त्यांनी नमूद केलं.
दरम्यान त्रिपुरा घटनेच्या आडून महाराष्ट्रात दंगली पेटवून त्यावर उत्तर प्रदेशात आपली राजकीय पोळी भाजण्याचे भारतीय जनता पक्षाचे षडयंत्र आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
राज्यातील जनतेने भाजपच्या षडयंत्राला बळी पडू नये, अफवांना बळी पडू नये, शांतता राखावी, असं आवाहन पटोले यांनी केलं. यावेळी पटोले यांनी महाराष्ट्रात झालेल्या हिंसक घटनांचा निषेध केला.
महागाई, बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, चीनची घुसखोरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून देशभर भारतीय जनता पक्षाच्याविरोधात तीव्र असंतोष आहे. या मुद्यांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाकडून असे षडयंत्र केले जात असल्याचा दावाही त्यांनी केला.