मुंबई – सध्या देशात सर्वात हॉट टॉपीक म्हणून आर्यन खान ड्रग्ज प्रकरण आणि त्यामुळे चर्चेत आलेले एनसीबीचे झोन अधिकारी समीर वानखेडे हेच आहेत. त्यातच समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केलेले आरोप यामुळे माध्यमांमध्ये सध्या तरी समीर वानखेडे यांचाच बोलबाला आहे. या संदर्भात अभिनेता अक्षय कुमारला छेडलं असता त्याने एनसीबी अधिकाऱ्याच्या भूमिकेविषयी आपली उत्सुकता बोलून दाखवली.
नवाब मलिक यांनी आरोप केल्यामुळे अनेकजण समीर वानखेडेंना खलनायक समजत आहेत. तर अनेक तरुणांना समीर वानखेडे हे हिरो वाटतात. मागील एक महिन्यापासून समीर वानखेडे यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप झाले आहेत. खुद्द साक्षीदारांनी त्यांच्यावर खंडणी गोळा करण्याचे आरोप केले आहेत. त्यामुळे वानखेडे आणि त्यांचं कुटुंब सध्या चर्चेत आहे.
एकंदरीतच सध्याच्या समीर वानखेडे आणि ड्रग्ज प्रकरणावर चित्रपट निघावा, असं अनेकांना वाटत आहे. तशी मागणीही सोशल मीडियावर होतेय. या संदर्भात बॉलिवूड खिलाडीने आपलं मत व्यक्त केलं.
अक्षयच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाने बॉक्सऑफीसवर चांगली कमाई केली. या चित्रपटाने पाच दिवसांत १०० कोटींची कमाई केली. या चित्रपटाच्या यशासंदर्भात अक्षयने माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी त्याला एनसीबी अधिकाऱ्याची भूमिका साकारणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अक्षयने सकारात्मक प्रतिसाद देत तशी ऑफर आल्यास नक्कीच एनसीबी अधिकाऱ्याची भूमिका साकारेल, अस म्हटलं.