चिंचणी (ता. शिरुर) – येथील घोड धरणाच्या दरवाज्यातून पाणी सोडल्यानंतर शिरुर तालुक्यातुन श्रीगोंदा तालुक्यात जाणाऱ्या वाहन चालकांना बोरी (ता. श्रीगोंदा) येथे घोड नदीवर पुल नसल्याने जीव मुठीत धरुन होडीच्या साह्याने धोकादायक प्रवास करावा लागत असुन,
गेल्या ६५ वर्षापासुन या ठिकाणी पुल उभारण्यात यावा अशी मागणी येथील दोन्ही गावचे ग्रामस्थ करत असुन प्रशासकीय उदासिनतेमुळे सर्वसामान्य लोकांना नाहक मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं आहे.
१९५६ साली घोड धरणात पाणी साठवायला सुरवात झाली अस काही जाणकार जेष्ठ मंडळी सांगतात. घोड धरणात १०० टक्के पाणीसाठा झाल्यानंतर धरणाच्या दरवाज्यातून नदीपात्रात पाणी सोडले जाते.
त्यावेळी हे पाणी पूर्वे दिशेला चिंचणी गावाला वळसा मारुन पुढे श्रीगोंदा तालुक्यातील बोरी या गावातुन परत शिरुर तालुक्यातील शिरसगाव काटा, पिंपळसुटी, इनामगाव, तांदळीमार्गे काष्टीला जाते.
चिंचणी हे गाव पुणे जिल्ह्याचं सर्वात शेवटचं गाव आणि बोरी हे अहमदनगर जिल्ह्याचं सर्वात शेवटी असणार गाव असुन या दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या या दोन गावांच्या मध्ये घोडनदीच पात्र असुन या दोन्ही नदीपात्राला जोडणारा एक मध्यवर्ती पुल बांधण्यात यावा अशी दोन्ही गावकऱ्यांची इच्छा आहे.
परंतु गेले ६५ वर्षापासुन केवळ राजकीय पुढाऱ्यांच्या इच्छाशक्ती अभावी या दोन्ही गावाला जोडणारा पुल बांधन शक्य झालेल नाही. घोड धरणाच्या दरवाज्यातुन पाणी खाली सोडल्यानंतर नदीपात्रात पाणी आल्यावर या दोन्ही गावांचा दळणवळणाचा संपर्क पूर्णपणे तुटतो.
अबालवृद्धांना जीव मुठीत धरुन होडीतून दुचाकी घेऊन धोकादायक प्रवास करावा लागतो. रात्रीच्या वेळेस अचानक एखाद्याला दवाखान्यात पुण्याला न्यायचं म्हणलं तर मग काष्टी मार्गे जावं लागतं.
त्यामुळे बोरी आणि चिंचणीला जोडणारा पुल झाला तर अहमदनगर तसेच श्रीगोंदा तालुक्यातील लोकांना पुण्यात जाण्यासाठी हा सोयीस्कर मार्ग होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी पुल उभारण्यात यावा अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.