पुणे -ग्रामीण कार्यक्षेत्रातील बाधित संख्या कमी होत असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे. मागील आठवड्यात वेल्हा तालुक्यात बाधित सापडण्याचे प्रमाण शून्य टक्के असून, भोरमध्ये 0.4 टक्के बाधित सापडण्याचे प्रमाण आहे.
13 तालुक्यांपैकी पाच तालुक्यात बाधित सापडण्याचे प्रमाण तीन टक्क्यांच्या तर पाच तालुक्यात हे प्रमाण दोन टक्क्यांच्या आत आहे. मात्र, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यांत हे प्रमाण चार टक्कयांच्या पुढे आहे.
जिल्ह्यातील ग्रामीणमध्ये दररोज शंभर ते दीडशेच्या आसपास बाधित सापडत आहे. मंगळवारी (दि. 26) पहिल्यांदा ग्रामीणमधील बाधित संख्या शंभरीच्या आत नोंदविण्यात आली; मात्र आठवडानिहाय बाधित सापडण्याचे प्रमाण पाहिले तर आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक 4.4, जुन्नर तालुक्यात 4.3 तर
शिरूर तालुक्यात 4 टक्के बाधित दर नोंदविण्यात आला आहे. दौंड, हवेली, इंदापूर, खेड आणि पुरंदर तालुक्यात बाधित दर 2 ते 2.6 टक्क्यांच्या आसपास आहे. तर बारामती, मुळशी आणि मावळ तालुक्यात बाधित दर 1.7 ते 1.8 टक्के आहे. सर्वांत कमी भोर तालुक्यात 0.4 तर वेल्हे तालुक्यात शून्य टक्के बाधित दर आहे.
घटता दर नियंत्रणात ठेवणे आवश्यक
शहरपाठोपाठ ग्रामीणमधील बाधित सापडण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. केवळ तीन तालुके सोडले तर सर्व तालुक्यांमधील बाधित दर अडीच टक्क्यांच्या खाली आहे. त्यामध्ये आणखीन घट होण्यासाठी आरोग्य विभागासह नागरिकांची महत्त्वाची जबाबदारी आहे.
सध्या सणासुदीचे दिवस असून, त्यामध्ये खरेदीसाठी किंवा कार्यक्रमानिमित्त होणारी गर्दी टाळणे आवश्यक आहे. तसेच मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग या त्रिसुत्रीचा अवलंब काटेकोरपणे करणे गरजेचे आहे.