मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर मंत्री नवाब मलिक हे दिवसेंदिवस नवनवीन आणि खळबळजनक आरोप करत आहेत. ड्रग प्रकरणी नवाब मलिक यांनी आर्यन खानला फसवण्यात आल्याचा मोठा दावा करत समीर वानखेडेंना नोकरी गमवावी लागणार आहे, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. तर नवाब मलिक यांनी सादर केलेली कोणतीही कागदपत्रे बनावट असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ राजीनामा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना एका प्रश्नाला उत्तर देताना मलिक म्हणाले की, माझ्याकडून सादर केलेली कोणतीही कागदपत्रे बनावट असल्याचे आढळल्यास मी राजीनामा देण्यास तयार आहे. अन्यथा त्यांनी (समीर वानखेडे) राजीनामा द्यावा. माझ्या जावयाला अशाच प्रकरणामध्ये गोवण्यात आले होते आणि आता आर्यन खानलाही फसवण्यात आले आहे. मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणाचा तपास करणाऱ्या समीर वानखेडे यांच्यावरही मलिक यांनी बनावट प्रमाणपत्र देऊन मागासवर्गीयाची नोकरी हिसकावून घेतल्याचा आरोप केला आहे.
बनावट जात प्रमाणपत्र आणि मागासवर्गीयांच्या नोकरीशी संबंधित प्रश्नावर नवाब मलिक यांनी प्रतिक्रियी दिली आहे. “या दाव्यांवर मला १०० टक्के खात्री आहे. उद्या मी त्यांचा निकाहनामा ट्विटरवर पोस्ट करेन. मी दिलेली सर्व मूळ कागदपत्रे आहेत. जर ती बनावट असतील तर त्यांना मूळ कागदपत्रे दाखवू द्या,” असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकरने पतीने बनावट प्रमाणपत्र मिळवून पात्र व्यक्तीची नोकरी हिसकावून घेतल्याचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
एनसीबीने जावयावर केलेल्या कारवाईनंतर समीर वानखेडे यांच्यासोबत बदला घेण्यासाठी हे सर्व करत आहात, या प्रश्नाला देखील नवाब मलिक यांनी उत्तर दिले. “या गोष्टींमध्ये काहीही तथ्य नाही आणि माझे कोणतेही वैयक्तिक संबंध नाहीत. हा लढा आहे. माझ्या जावयाला अटक झाली तेव्हा मी म्हणालो होतो की कोणीही कायद्याच्या वर नाही आणि न्यायव्यवस्था या प्रकरणाचा निर्णय घेईल.
आठ महिन्यांहून अधिक कालावधीनंतर तो जामिनावर बाहेर आला आणि मी हे आरोप खोटे असल्याचे स्पष्ट केले. त्यांना काहीच मिळाले नाही. या प्रकरणात आम्ही सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून होतो. आम्ही या प्रकरणाची चौकशी केली आणि क्रूझच्या छाप्यादरम्यान दिसलेल्या दोन लोकांबद्दल प्रश्न उपस्थित केले पण कोणतेही उत्तर मिळाले नाही,” असे मलिक म्हणाले.