तैसाचि द्विविध रसु । उपजवी प्रीति त्रासु । म्हणौनि हा अपभ्रंशु । विषयसंगु ।। 118 ।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, सुगंध आणि दुर्गंध हा भेद एकाच गंधाचा आहे. परंतु तो नाकाशी संपर्क आल्यावर समाधान आणि विषाद उत्पन्न करतात.
त्याच अनुषंगाने “रस’ विषयाचा रसनेंद्रियांशी संयोग आल्यावर प्रतिकूल- अनुकूल असे कडू-गोड दोन भेद निर्माण होतात. म्हणजे विषयांचा संबंध अतःकरणात प्रीती आणि तिटकारा उत्पन्न
करतो. म्हणून विषयाचा संग आपल्या अंत:करणाला विकृत करणारा आणि स्वरूपाचा, ज्ञानाचा विसर पाडणारा आहे. विषयसंग आपल्या अधोगतीला कारण होतो.
अर्थात मनुष्य जेव्हा इंद्रियाच्या स्वाधीन होतो तेव्हा तो आपणहून सुखदुःखात जखडला जातो. विषयावाचून या जगतामध्ये सुखदायक सर्वतोपरी असे काहीच नाही असा इंद्रियांचा स्वभाव असतो, त्यामुळे ती आपोआप विषयांकडे आकर्षित होतात.