मुंबई : देशाच्या सीमेवर सुरु असलेला चीन सीमावादाचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे. या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपले विचार मांडले. देशाचा सीमाप्रश्न हा अत्यंत गंभीर विषय आहे. त्यावर देशातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन भूमिका घेण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत शरद पवार यांनी मांडले.
गेले काही महीने चीनसोबत देशाचा सुरु असलेल्या चर्चेचा 13 वा राऊंडही अयशस्वी ठरला आहे. एका बाजूला आपली चीनसोबतची बोलणी अयशस्वी होत आहेत तर दुसरीकडे त्याचवेळी पुंछ वा काश्मीर मधल्या काही भागात दुसरी प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. हे सतत घडणे हे चिंताजनक असल्याने सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एक सामूहिक भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
भारत-चीन सीमाप्रश्नावर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मला आणि ए.के. अँटनी यांनी ब्रिफींग केले. राजकीय प्रश्नांवर अथवा अन्य प्रश्नांवर आपण सगळेच बोलू शकतो. मात्र राष्ट्रावर एखादा आघात होत असेल तर त्याठिकाणी कोणतेही राजकारण न आणता संरक्षण विभागाने घेतलेल्या भूमिकेशी सुसंगत भूमिका सगळ्यांची राहील, असे पवार साहेब म्हणाले. पुढील काळात सविस्तर चर्चा करून यावर कलेक्टीव्ह लाईन कशी घेता येईल यावर विचार करायला हवा, असे मत शरद पवार यांनी मांडले.
आपल्या शेजारील मोठा भाऊ चीन हा आता सिमीत राहिलेला नाही. नेपाळ, बांग्लादेश, भूतान, श्रीलंका आणि काश्मीरसह सबंध भारताच्या भोवती आर्थिक किंवा लष्करी केंद्रं ही चीनच्या ताब्यात आहेत. त्यामुळे सर्व देशाभोवती चीनचे साम्राज्य वाढलेले दिसत असताना यामध्ये कोणतेही राजकारण न आणण्याची सर्व विरोधी पक्षातील सहकाऱ्यांची भूमिका असल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.