नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद मोदी यांनी आज गतीशक्ती राष्ट्रीय योजनेच्या मास्टर प्लानचे प्रकाशन केले. देशात शंभर लाख कोटी रूपये खर्चून व्यापक स्तरावर पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत त्यासाठीचा हा आराखडा आहे.
मोदी म्हणाले की देशातील मालवाहतुकीचा विषय सुलभ करण्याच्या उद्देशाने ही योजना आखण्यात आली आहे. राज्य सरकारांच्या योजना आणि केंद्राच्या योजनां एकत्र करून पायाभूत सुविधांचे जाळे देशभर विस्तारले जाणार आहे असेही त्यांनी सांगितले.
उत्तम पायाभूत सुविधांखेरीज विकासाला चालना मिळू शकणार नाही, त्यामुळेच या योजनेची आखणी करण्यात आली आहे. रेल्वे, विमान वाहतूक मंत्रालय आणि कृषी मंत्रालय या मंत्रालयांच्या समन्वयाने ही आखणी केली जाईल असे त्यांनी म्हटले आहे. भारतात हायलॉजिस्टीक कॉस्ट आहे. ती जीडीपीच्या तेरा टक्के इतकी आहे.
त्यामुळे आपण निर्यातीतील स्पर्धात्मक वातावरणात कमी पडतो आहोत. गती शक्ती योजनात लॉजिस्टीक कॉस्ट कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असे ते म्हणाले. भारत हे गुंतवणुकीला पुरक क्षेत्र होईल यासाठी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
देशातील पायाभूत क्षेत्रात गेल्या 27 वर्षात जे काही झाले तेवढे काम आम्ही त्यापेक्षाही कमी वेळात करून दाखवणार आहोत असे प्रतिपादनही पंतप्रधान मोदींनी केले. सन 2015 साली देशात एकूण अडीचशे किमीचा मेट्रो मार्ग उपलब्ध होता, तो आता सातशे किमीचा झाला असून अन्य एक हजार किमीच्या मेट्रो मार्गाचे काम सध्या सुरू आहे असेही त्यांनी नमूद केले आहे.