नवी दिल्ली – सध्या काश्मीरात मोठ्या प्रमाणात दहशतवादी कारवाया घडू लागल्या असून त्यामुळे येथील सर्वांनाच आता असुरक्षित वाटू लागले आहे असे जम्मू काश्मीरातील माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
प्रशासनाने या राज्यात सर्वांसाठीच सुरक्षेचे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे असे त्यांनी म्हटले आहे. आत्तापर्यंत यावर्षी जे दहशतवादी हल्ले झाले आहेत त्यात 28 नागरीकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये काश्मीरी पंडित आणि शिख नागरीकांवर हल्ले झाले असून त्यामुळे त्यांचे आता येथून पुन्हा पलायन होताकामा नये असेही त्यांनी म्हटले आहे. काश्मीरात आज कोणत्याच धर्माचे लोक सुरक्षित राहिलेले नाहीत.
येथील अल्पसंख्यांना जसा धोका वाढतो आहे तसा धोका बहुसंख्याकांनाही वाटतो आहे असे ते म्हणाले. काश्मीरातील हिंसाचार रोखण्यास प्रशासनाला व्यापक अपयश आल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला आहे.