मुंबई – साकीनाका बलात्कार प्रकरणावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यादरम्यान झालेल्या पत्रव्यवहारावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना फडणवीस यांनी, ‘मुख्यमंत्री कार्यालयातील काही अधिकारी किंवा सल्लागार अतिशय अपरिपक्व असल्यामुळे अशाप्रकराचं पत्र गेलं आहे.’ अशी भूमिका मांडली.
तत्पूर्वी, साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत, शक्ती कायद्याची अंमलबजावणी, तसेच विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन बोलावण्याची मागणी केली होती. या पत्राला प्रतिसाद देत मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपालांना एक पत्र पाठवले. यामध्ये त्यांनी, राज्यपालांनी महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांना विनंती करुन संसदेचं चार दिवसीय विशेष सत्र बोलावाव, अशी मागणी केली होती.
राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्यादरम्यान झालेल्या या पत्रव्यवहारावरून राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष पाहायला मिळाला. अशातच आता विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी राज्यपालांची बाजू उचलून धरत मुख्यमंत्री कार्यालयावर अपरिपक्वतेचा आरोप लगावला आहे.
काय म्हणाले फडणवीस?
“मी गेली 25 वर्षे झाली पाहतोय. सरकार कुणाचंही असो, राज्यपाल कुणाचेही असो, अशाच प्रकारचं पत्र फॉरवर्ड केलं जातं. पण, राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांकडून प्रत्युत्तर दिल्याचं कळालं. मुख्यमंत्री कार्यालयानं अपरिपक्वता दाखवली. मुख्यमंत्री कार्यालयातील काही अधिकारी किंवा सल्लागार अतिशय अपरिपक्व असल्यामुळे अशाप्रकराचं पत्र गेलं आहे. अशाप्रकारचं पत्र पाठवण्याऐवजी राज्यातील पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिले असते, तर ते अधिक संवेदनशील दिसलं असतं. या प्रकाराला अशाप्रकारे राजकीय रंग देणं योग्य नाही. हे तर अपरिपक्वतेचं परिचायक आहे,”