– माधव विद्वांस
नवयुगातील कवी, कथाकार, अनुवादक व प्रतिभावंत चित्रकार प्रा. सदानंद शांताराम रेगे यांचे आज पुण्यस्मरण. कोकणच्या रत्नभूमीत अनेक साहित्यिक, राजकारणी, समाजसेवक रूपाने अनेक रत्ने दिली त्यापैकी साहित्यरत्न म्हणजेच प्रा. सदानंद रेगे. त्यांचा जन्म 21 जून 1923 रोजी त्यांच्या आजोळी राजापूर येथे झाला.
वाडा-पडेल या गावाजवळील पुरळ हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे बालपण मात्र मुंबईत गेले. ते 12 वर्षांचे असतानाच त्यांचे पितृछत्र हरपले. त्यांना जन्मतःच चित्रकला अवगत होती तसेच आवडही होती. वर्ष 1940 मध्ये छबिलदास हायस्कूलमधून मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला.
दोन भाऊ, दोन बहिणी व आई असे पाच जणांचे कुटुंब सांभाळण्यासाठी त्यांना शिक्षण सोडावे लागले. ते वर्ष 1942 मध्ये गिरणीत डिझायनरचे काम करू लागले. नोकरी करीत असताना त्यांनी चित्रकलेचेही शिक्षण सुरू ठेवले.
वर्ष 1958 मध्ये सिद्धार्थ महाविद्यालयातून त्यांनी मराठी विषय घेऊन बी.ए.ची पदवी संपादन केली. त्यानंतर वर्षे 1961 मध्ये कीर्ती महाविद्यालयातून इंग्रजी विषय घेऊन एम.ए. उत्तीर्ण झाले. त्यानंतर रेल्वेत काही काळ नोकरी केली.
पुढे वर्ष 1962 पासून वर्ष 1982 पर्यंत सुमारे 20 वर्षे इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रुईया महाविद्यालयात नोकरी केली. तेथे त्यांना कवी विंदा करंदीकर यांचे सहकारी शिक्षक म्हणून सहवास मिळाला. दोघेही वांद्रे येथील साहित्य सहवासमध्येच राहात.
ते जाहिरातींचे भाषांतर करीत तसेच नाट्यपरीक्षण व आकाशवाणीसाठी खूप लेखन केले. पोपटांना ते बोलायला शिकवीत असत. त्यांचा स्वभाव काहीसा एकलकोंडा, विक्षिप्त असला तरी ते हसतमुख असायचे.
चित्रकलेच्या छंदामध्ये त्यांना आचरेकर, बेंद्रे, आंबेरकर, सोलेगावकर, कुलकर्णी व दलाल या मातब्बर चित्रकारांचे मार्गदर्शन लाभले.
त्यामुळे ते उत्तम चित्रकार बनले. शालेय जीवनात इतिहासतज्ज्ञ डॉ. रवींद्र रामदास व अ. वि. काळे हे गुरुजन लाभले. प्रभाकर पाध्ये यांच्या सहवासात त्यांच्या लेखनास एक दिशा मिळाली.
वर्ष 1951 मध्ये “धनुर्धारी’ या मासिकात त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. त्यानंतर सत्यकथा, झंकार, चित्रा, अभिरुची, यशवंत व हंस अशा अनेक नियतकालिकांमधून त्यांनी लेखन केले.
प्रभाकर पाध्येंच्या मदतीने त्यांनी युरोपचा दौराही केला. त्यांनी नॉर्वेजियन भाषा अवगत केली. मोहन पालेकर यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले तसेच नवनाट्यशास्त्र आत्मसात केले.
त्यांच्या वाङ्मयीन कारकिर्दीची सुरुवात कवितेपासून झाली. त्यांची पहिली कविता 1948 मध्ये “अभिरुची’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाली. मर्ढेकरांप्रमाणे नवकाव्याच्या परंपरेतील कवी म्हणून ते ओळखले जातात.
“अक्षरवेल’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह वर्ष 1950 मध्ये प्रकाशित झाला. त्यांचे “गंधर्व’, “देवापुढचा दिवा’, “ब्रॉंकुशीचा पक्षी’, “वेड्या कविता’ हे कवितासंग्रह प्रकाशित झाले.
त्यांनी बालचमूसाठी “रडतोंडीचा घाट’, “चांदोबा-चांदोबा’ व “झोपाळ्याची बाग’ ही पुस्तके लिहिली. 21 सप्टेंबर 1982 रोजी त्यांचे मुंबईत निधन झाले. अभिवादन.