मुंबई : राज्यातल्या करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सवावर सरकारने बंदी घातली होती. पण सरकारच्या नियमांना धाब्यावर बसवत मुबंईत काही ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनीही दहीहंडी उत्सव साजरा केला. याबद्दल राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पाठिंबा दिला आहे. तसेच यावेळी त्यांनी राज्यातल्या नारायण राणे- शिवसेना संघर्षावरही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“सर्व गोष्टी चालूच आहेत की. नारायण राणेंच्या विरोधात जे झालं, यांच्या हाणामाऱ्या सुरु आहेत. बाकीच्या सगळ्यांचे मेळावे सुरु आहेत. भास्कर जाधव यांच्या मुलाने मंदिरात जाऊन अभिषेक केला. म्हणजे यांच्यासाठी मंदिरं सुरु, बाकीच्यांनी मंदिरात जायचं नाही. यांनी मेळावे, सभा घ्यायच्या पण आम्ही दहीडंही साजरी करायची नाही.
कुठूनही गर्दी कमी झालेली दिसत आहे का ? मैदानांमध्ये क्रिकेट, फुटबॉल खेळत आहेत. महापौर बंगल्याजवळ सरकारकडून कामं करुन घेण्यासाठी येणाऱ्या बिल्डरांच्या गाड्या काही कमी झालेल्या नाहीत. मग सणांवरच का निर्बंध येतात?” अशी विचारणा राज ठाकरेंनी केली आहे.
माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेवरही टीका केली आहे. ते म्हणाले, ‘जन आशीर्वाद यात्रा झाली ती चालली. तेव्हा तुमचा लॉकडाउन नाही. सण आला की लॉकडाउन, म्हणजे सणांमधून रोगराई पसरते. यांच्या जन आशीर्वाद यात्रेतून, मेळाव्यांमधून, हाणामाऱ्यांमधून नाही. हवंय तेवढं वापरायचं आणि जनतेला घाबरवायचं असं सुरु आहे”.