– नारायण ढेबे
नुकतेच तेवीस गावांचा समावेश पुणे महानगरपालिकेमध्ये करण्यात आला आहे. याच अनुषंगाने पुणे आणि पुण्याचा परिसर याचा अभ्यास होणे ही गरज वाटते. तो अभ्यास असा असावा की, पुढील पन्नास वर्षांचा विचार करून या गावांमधील सोयी-सुविधांचा विचार केला जावा आणि मगच या भागांचा विकास करण्यासाठी महानगरपालिकेने त्या दिशेने पावले उचलून कामाला लागावे.
भले हा विकास थोडा संथ गतीने आणि टप्प्याटप्प्याने झाला तरी चालेल परंतु हा विकास होताना बारीक सारीक गोष्टींचा विचार होणेही खूप महत्त्वाची बाब राहणार आहे. जसे की या गावांमधील सध्याच्या परिस्थितीमध्ये असणारे प्रश्न, अडचणी या कशा प्रकारच्या आहेत त्या समजून घेऊन मगच एका एका गोष्टीवर लक्ष केंद्रित होऊन त्या गोष्टींच्या तळाशी जाऊन अभ्यास करून मगच विकास व्हावा, असे वाटते.
उदाहरणार्थ, या सर्व गावांमध्ये पाण्याचा प्रश्न आहे. येथे टॅंकरद्वारे पाणी पुरवले जाते. तेव्हा या भागांत पाण्याच्या टाक्या बांधून तो पाणीपुरवठा सुरळीत कसा होईल याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. या भागातील रस्ते अतिशय छोटे आणि कच्चे आहेत. त्याच्यावर विचारपूर्वक काम करणे गरजेचे आहे.
एक रस्ता बनवला तर तो पुन्हा बनवण्यासाठी किमान पुढील पंचवीस ते तीस वर्षांचा विचार व्हावा. नाहीतर यावर्षी रस्ता बनवला जाईल आणि पुन्हा पुढच्या वर्षी लाइटसाठी तो खोदला जाईल आणि नंतर पुन्हा पुढील वर्षी तो पाण्याच्या पाइपलाइनसाठी खोदला जाईल. तो रस्ता डांबरी असो किंवा सिमेंटचा, तो बनवण्याच्या अगोदरच सर्व विभागांनी मिळून काम करावे आणि प्रत्येक विभागाने एकमेकाला कनेक्ट राहावे त्यामुळे काम लवकर होईल. या प्रत्येक गावांचा अभ्यास करून, तेथे मोजणी करून बांधकाम झालेल्या जागा आणि मोकळ्या जागा तसेच विकासामध्ये आडकाठी येणाऱ्या जागा परवानगीशिवाय अतिरिक्त झालेली बांधकामे या सर्व गोष्टींचा विचार व्हावा आणि तशा प्रकारचा आराखडा निर्माण केला जावा.
पीएमआरडीए मार्फत या संपूर्ण गोष्टी पडताळून पाहणे गरजेचे आहे. वीज वितरण कंपनीने देखील आपण देणार असलेली वीज अतिशय चांगल्या प्रकारे ग्राहकांपर्यंत पोहोचली जाईल.
हाय-डेफिनेशन ट्रान्सफॉर्मर बसवले जातील की जे पुढील काही वर्षे बदलावे लागणार नाहीत. येथे बऱ्याचशा मोकळ्या भागावर अतिरिक्त बांधकामे झालेली आहेत. तेथे ती बांधकामे कायम करताना झाडांची लागवड झालेली आहे की नाही, पर्यावरणाला कोठे धोका तर पोहोचत नाही ना, याचाही अभ्यास व्हावा.