– प्रतिनिधी
संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अरविंद नेरकर यांचे आत्मकथन “आठवणींच्या हिंदोळ्यावर’ नुकतेच प्रकाशित झाले. साधेपणा, सरलता अशा लेखनातून हे आत्मकथन प्रभावशाली वाटते.
तसं पाहिलं तर नेरकर यांचा बालपणापासूनचा जीवनप्रवास खडतरच म्हटला पाहिजे.
शिक्षणानंतर नोकरी प्रथम वार्ताहर, पर्यटन विकास महामंडळात सहाय्यक माहिती अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात प्रसिद्धी व जनसंपर्क अधिकारीपदी नियुक्ती झाल्यावर स्थैर्य प्राप्त झाले. मात्र, बदली झाल्यावर पुन्हा विस्कळीत झाले तरी अडचणी, समस्यांवर मात करण्याची त्यांची प्रवृत्ती वैशिष्ट्यपूर्ण वाटते. नोकरी सांभाळून त्यांनी एमए (मराठी) पदवी मिळवली. तसेच “पंढरपूर वारी आणि मराठी साहित्य’ या विषयावर संशोधन करून डॉक्टरेट मिळवणाऱ्या नेरकर यांनी संतसाहित्याचा अभ्यासक म्हणून लोकप्रियता मिळवली. वृत्रपत्रीय लेखनात विविधस्पर्शी लेखन करताना त्यांना कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा सहवास वेळोवळी भेटीतून सुमारे 30 वर्षांहून अधिक काळ लाभला. त्याचे विवेचन “आठवणीतले कुसुमाग्रज’ या प्रकरणातून त्यांनी केले आहे.
जनसंपर्काचे क्षेत्र आवडीने निवडले आणि प्रदीर्घ काळपर्यंत या क्षेत्रात सेवा करून उपमुख्य जनसंपर्क अधिकारी पदावर असताना डॉ. नेरकरांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली त्यावेळी त्यांना सेवानिवृत्तीला 5 वर्षे शिल्लक होती. जनसंपर्काचे कार्य करताना ग्राहकांच्या अडीअडचणी निराकरणार्थ त्यांनी सतत प्रयत्न करून लौकिक प्राप्त केला. “या वळून पाहता मागे’ सांगितलेल्या स्मृतिशलाका त्यांनी मोठ्या प्रांजळपणे उजळल्या आहेत. जे जे प्रत्यक्षात घडत गेलेले आहे ते ते सरळ सांगितले आहे. कटू प्रसंगातील कडवटपणा बाजूला ठेवून संतविचाराचा प्रभाव महत्त्वपूर्ण ठरतो. हे आत्मवृत्त वाचायला घेतले की, त्याचा ओघ आपल्या लक्षात येतो.
डॉ. नेरकर थेट आपल्या जीवनानुभवाला भिडतात. ते कुठेही पाल्हाळ लावत नाहीत. त्यामुळे कथनात कुठे पसरटपणा नाही की कंटाळवाणेपणा नाही. बालपणीच्या अनंत अडचणींचा ते पाढा वाचीत नाहीत. शिक्षण घेतानाच्या अडथळ्यांचाही नाही; उलट त्यातील सकारात्मक बाजू मांडतात. संकटावर मात करणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलून दिसते.
स्वेच्छानिवृत्तीनंतर “शब्दगांधार’ दिवाळी अंकाचे संपादक व प्रकाशक म्हणून ते रममाण झाले. विख्यात गायिका चारूशिला बेलसरे यांची सुरेख साथ म्हणजे सतारीच्या तारा जुळाव्यात, इतकेच नव्हे तर त्यांच्या संगीत कार्यक्रमात निवेदन-निरूपण करण्यातून रसिकप्रिय झाले. आतापर्यंत 12 पुस्तकेही डॉ. नेरकर यांची प्रकाशित झाली आहेत. मुलगी डॉ. गौरी हिच्या जर्मन येथील संशोधन काळात त्यांनी जर्मनीला भेट देऊन वास्तव्य केले होते. “माझी जर्मनवारी’ या प्रकरणातून त्यांनी जर्मनीतील ज्या स्थळांना भेटी दिल्या तसेच बर्लिन येथे व्याख्यान दिले त्याची आठवण सांगितली आहे.
“अहंकाराचा वारा न लागो माझिया मना’ याचा प्रत्यय येणारे “आठवणींच्या हिंदोळ्यावर’ डॉ. नेरकर यांचे आत्मकथन त्यातील साधेपणाने वाचकांच्या मनावर ठसते. हे पुस्तक स्वरमहिमा प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.