संतांचे संगती मनोमार्ग गती । आकळावा श्रीपती येणे पंथे ।।
संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठातील अभंगात म्हणतात, संतसंगतीने मनुष्य सन्मार्गाला लागतो. संतांच्या संगतीत राहून भगवंताला आपलेसे करता येते. संतसंग धरा तुम्ही हरिभजन करा । पाठी लागलासे काळ दात खातो करकरा ।।
माऊली म्हणतात, प्रत्येकाच्या पाठीमागे काळ लागलेला आहे. या मनुष्यदेहाचा क्षणाचा भरवसा नाहीये. त्यामुळे संतांची संगत धरा, हरिभजन करा, देवाला आपलेसे करा. जगद्गुरू तुकोबाराय सांगतात, संतसमागमीं धरूनि आवडी । करावी तांतडी परमार्थाची ।। संतांच्या संगतीविषयी प्रीति धरून परमार्थ साध्य करून घेण्याची त्वरा करा, असे तुकोबाराय सांगतात.
संतांच्या विचारांच्या संगतीत राहूनही परमार्थ साधू शकतो. संतांनी लिहून ठेवलेले अभंग ग्रंथ यांचे वाचन करणे, त्यांनी सांगितलेले विचार आत्मसात करणे, त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावर चालणे. या माध्यमातून आपण त्यांच्या संगतीत राहू शकतो आणि भगवंताला आपलेसे करू शकतो.