मुंबई – राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा वेग मंदावल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष लॉकडाऊनकडे लागून आहे. याआधी १ जून पर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. दरम्यान १ जूननंतरही लॉकडाऊन असणार का असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. असे असताना 50 टक्के नागरिकांचे लसीकरण झाले तरच लॉकडाऊन उठू शकतो, असं वक्तव्य आज कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांनी केले आहे. तसेच हॉटेल, सलून व्यावसायिक, इलेक्ट्रिक दुकानांबाबत टास्क फोर्स व मुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याचे शेख यांनी सांगितले.
राज्यातील लॉकाडाऊन संदर्भात आज कॅबिनेट बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान लॉकाडाऊन वाढीबाबत कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांनी भाष्य केले असून ते म्हणाले आहेत की, जोपर्यंत राज्यात 50 टक्के लसीकरण पुर्ण होत नाही, तोपर्यंत लॉकडाऊनमध्ये कोणताही दिलासा देणं हे करोनाला आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे सध्या लॉकडाऊनमध्ये कसा दिलासा देता येईल, काय नियम असतील, कोणत्या दुकानांना परवानगी देता येईल याचा विचार सुरु आहे. टास्क फोर्स याबाबत सूचना करतील. त्यानंतर कॅबिनेटमध्ये योग्य तो निर्णय घेऊन, यासंदर्भात घोषणा केली जाईल. असे माहिती मंत्री शेख यांनी दिली आहे.
राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत जाताना दिसून येत मात्र करोनामुळे मृतांचा आकडा अजूनही वाढत जात आहे. त्याचबरोबर काळ्या बुसशीचे नवीन संकट समोर आहे. याअनुशंगाने लॉकडाऊन संदर्भात सरकार कोणती भूमीका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. सोबतच करोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा धोका लक्षात घेऊनच सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे.