नवी दिल्ली : हरियाणाच्या शेतकऱ्यांनी भाजपच्या सरकारविरुद्ध एक मोठा विजय मिळवला. त्या दिवशी संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली हिसार शहराच्या क्रांतिमान पार्कमध्ये 10,000 हून अधिक शेतकऱ्यांची विशाल सभा झाली.
राज्य सरकारने आंदोलन दडपण्यासाठी 3000 हून अधिक पोलीस आणि रॅपिड ऍक्शन फोर्सचे कमांडो तैनात केले होते. पण हजारो शेतकरी त्यांचे ट्रॅक्टर्स, ट्रॉली, टेम्पो, गाड्या व इतर वाहनांनी जमताच या दमन यंत्रणेचे काही एक चालले नाही
16 मे रोजी हिसार येथे भाजपचे मुख्यमंत्री खट्टर यांच्या कार्यक्रमात हजारो शेतकऱ्यांनी निदर्शने केली होती. त्यावर पोलिसांनी लाठीहल्ला केला आणि अश्रुधुराच्या नळकांद्या फोडल्या. शेकडो शेतकरी गंभीररीत्या जखमी झाले. त्यावर कडी म्हणजे पोलीस केसेस होणार नाहीत असे आधी मान्य करूनही दोन दिवसांनी भाजप सरकारने 350 शेतकऱ्यांवर कलम 307 (खुनाचा प्रयत्न) व इतर गंभीर कलमे लावून खटले भरले, असा आरोप शेतकऱ्यांनी केला.
24 मे रोजी शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाला घेराव घालण्याचे ठरवले होते. पण घेराव सुरू होण्यापूर्वीच प्रशासनाने एसकेएमला चर्चेचे आमंत्रण दिले. विभागीय आयुक्त व इतर अधिकाऱ्यांशी तब्बल 4 तास चर्चा झाली.
शेवटी 350 शेतकऱ्यांवरील 16 मेचे व त्यापूर्वीचे सर्व पोलीस खटले मागे घेण्याचे, 16 मे रोजी पोलिसांनी शेतकऱ्यांच्या ज्या अनेक वाहनांची नासधूस केली होती त्यांची नुकसानभरपाई देण्याचे आणि रामचंद्र नावाचा जो शेतकरी 24 मेच्या आंदोलनात हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावला त्याच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरीत सामावून घेण्याचे प्रशासनाला मान्य करावे लागले.
16 मेच्या पोलीस दडपशाहीबद्दल आयुक्तांनी दिलगिरी व्यक्त केली. हा शेतकरी आंदोलनाचा मोठा विजय असल्याचं मत शेतकरी संघटनेने व्यक्त केलंय