जळोची – नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने गुजरात व महाराष्ट्रासह इतर दोन राज्यातही मोठे नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानातून गुजरातमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी केली. आणि मदत ही फक्त गुजरात राज्यासाठी जाहीर केली. आम्ही सर्व आशावादी आहोत की, ,महाराष्ट्रासह इतर दोन राज्यांमध्ये झालेल्या नुकसानीसाठीही केंद्राकडून मोठ्या प्रमाणात मदत केली जाईल.
महाविकास आघाडी सरकार बरोबरच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. राज्य सरकार तर नुकसान ग्रस्तांना मदत करेलच मात्र केंद्राकडून राज्याला मदत मिळवण्यासाठी फडणवीस यांच्याकडून केंद्राला पत्र जाईल अशी अपेक्षा युवा आमदार रोहित पवार यांनी बारामतीत व्यक्त केली.
केंद्राचा नियोजनाचा अभाव…..
अखंड जगावर कोरोनाचे संकट असताना भारतात पश्चिम बंगाल, तामिळनाडू आदी राज्यांमध्ये निवडणुका सुरू होत्या. तसेच विविध कार्यक्रमात ठीक ठिकाणी मोठी गर्दी होत होती. या सगळ्या गोष्टींमुळे देशवासियांना लसीची गरज असताना लसीचे उत्पादन वाढायला देश कमी पडला. या बाबतच्या चर्चा भारताबाहेर जेव्हा होऊ लागल्या तेव्हा नियोजनाचा अभाव असल्याचे दिसून आले.
देशात सध्या मोठ्या प्रमाणात लसीचा तुटवडा आहे. असे असताना केंद्र सरकारच्या मालकीची तामिळनाडू येथील लस निर्मिती कंपनी सध्या बंद अवस्थेत आहे. या कंपनीत महिन्याला ५ तर वर्षाला ६० कोटी लस उत्पादन करण्याची क्षमता आहे.
लसीचा तुटवडा पाहता केंद्र व राज्य सरकारांनी समन्वय साधून सदर कंपनी सुरु करावी, अशी अपेक्षा युवा आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.