सिंगापूर – दिललीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिंगापूरमध्ये कोविडचा नवा विषाणू ( corona Singapore variant ) निर्माण झाला असून त्यामुळे भारताने सिंगापूरचा हवाई संपर्क त्वरित बंद करावा, अशी सूचना भारत सरकारला केली आहे, त्याला सिंगापूरच्या विदेश मंत्र्यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.
त्या देशाचे विदेश मंत्री व्हिवियन बालकृष्णन यांनी म्हटले आहे की, केजरीवालांनी सत्याकडे डोळेझाक करू नये.
सिंगापूर व्हेरिएंट ( corona Singapore variant ) नावाचा कोणताही नवीन विषाणू अस्तित्वात नाही. ज्या बी.1.617 विषाणूचा केजरीवालांनी उल्लेख केला आहे तो विषाणू भारतातच पहिल्यांदा सापडला आहे, असे सिंगापूरचे म्हणणे आहे.
दरम्यान, भारताचे विदेश मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे की, केजरीवालांनी भारताच्या वतीने हे विधान केलेले नाही. त्यांना या विषयीची काहीही कल्पना नाही. त्यांच्या बेजबाबदार विधानांमुळे दोन्ही देशांतील संबंधांना बाधा येऊ शकते.
भारत आणि सिंगापूर या दोन्ही देशांचे अनेक बाबतीत घनिष्ट संबंध आहेत. त्यामुळे केजरीवालांनी अशी बेजबाबदार विधाने करू नयेत, असेही जयशंकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सिंगापूर सरकारने भारताच्या दूताला विदेश मंत्रालयात बोलावून घेऊन केजरीवालांच्या सिंगापूर व्हेरिएंट या शब्दाबद्दल आक्षेप नोंदवला आहे.
दरम्यान, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना दोन देशांबद्दलच्या विमानसेवेबद्दल निर्णय घेण्याचा किंवा विधान करण्याचा कोणताही अधिकार नाही, असेही भारताच्या दूताने सिंगापूरच्या विदेश मंत्र्यांना स्पष्ट केले आहे, असेही सांगण्यात येते.
सिंगापूरच्या आरोग्य मंत्र्यांनीही सिंगापूर व्हेरिएंट नावाचा कोणताही विषाणू अस्तित्वात नसल्याचे म्हटले आहे. जो विषाणू सिंगापूरमध्ये अस्तित्वात आहे तो भारत, ब्रिटन आदी देशांतही या आधी आढळून आला आहे असेही त्यांनी म्हटले आहे.