मुंबई ( maharashtra corona updates ) – देशातील करोना रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्यव्यवस्थेवर प्रचंड ताण आला असून काही ठिकाणी रुग्णांना उपचारांअभावी आपले प्राण गमवावे लागत आहेत. एकीकडे देशातील इतर राज्यांमध्ये करोनाची दुसरी लाट उसळी घेत असतानाच महाराष्ट्रात मात्र आता दिलासादायक चित्र निर्माण होताना दिसतंय. प्राप्त आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील रुग्णवाढीचा आलेख खाली येऊ लागला आहे.
महाराष्ट्र व विशेषतः मुंबई शहरातील करोना परिस्थितीबाबत सर्वोच्च न्यायालयाने देखील कौतुक केलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यातील महाविकास आघाडी व शिवसेनेचे तोंडभरून कौतुक केले आहे.
…म्हणून इतर राज्यांमध्ये चिता पेटलेल्या दिसत आहेत
संजय राऊत म्हणतात, “आम्ही आता देखील आदित्य ठाकरे यांच्यासोबत पुण्यात तीन करोना सेंटरचं उद्घाटन केलं. हे सरकारी सेंटर नाहीत. ही शिवसेनेच्या माध्यमातून उभारली आहेत. महाराष्ट्राची स्थिती आज चांगली का आहे? तर सरकारला समांतर अशी करोना केंद्र आणि यंत्रणा राजकीय कार्यकर्ते देखील उभारत आहेत. त्यामुळे सरकारवरील भार कमी होत आहे. हे इतर राज्यांत आजवर झालेलं नाही. अनेक राज्यांमध्ये शिवसेनेसारखं काम इतर पक्षांना जमलेलं नाही. त्यामुळे आज इतर राज्यांमध्ये चिता पेटलेल्या दिसत आहेत. आज कब्रस्तानमध्ये देखील जागा नाही. याचं हेच कारण आहे”
मुख्यमंत्री ठाकरेंचं कौतुक
“देशात महाराष्ट्र पॅटर्न किंवा आज महाराष्ट्र मॉडेल असा संदर्भ दिला जातोय. याचे सर्वोच्च न्यायालयानेही कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महाराष्ट्राच्या करोना लढ्याचं कौतुक केलं. महाराष्ट्रानं स्वत:ची लढाई स्वत:च्या बळावर निर्माण केली आणि लढली आहे. याचं श्रेय नक्कीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांना जातं”, असं संजय राऊत म्हणाले.