मुंबई – राज्यात करोनाचा हाहाकार असून गंभीर रुग्णांची संख्याही वाढतीच आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २४ तासांत तीन वेळा फोन केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना २४ तासांत तीन वेळा फोन करून महाराष्ट्राला तातडीने १२०० ते १५०० मेट्रीक टन ऑक्सिजन देण्याची मागणी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी दि. १३ एप्रिल रोजी जनतेशी संवाद साधताना त्यांनी ऑक्सिजन तुटवड्याची माहिती दिली होती. हवाई मार्गाने ऑक्सिजनचा पुरवठा महाराष्ट्राला करावा, अशी विनंतीही केंद्र सरकारकडे केली होती.
राज्यात आज ६१,६९५ करोना बाधित रुग्णांची वाढ झाली व आज नवीन ५३,३३५ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण २९,५९,०५६ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ६,२०,०६० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८१.३% झाले आहे.
दरम्यान, याआधीही उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून राज्यापुढे असणाऱ्या आव्हानांची माहिती दिली होती. राज्यात करोना बाधित वाढल्यामुळे ऑक्सीजनचा तुटवडा भासत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर चाचण्या होत आहेत. ३० एप्रिलपर्यंत ही रुग्ण संख्या ११.९ लाखापर्यंत जाऊ शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा चिंतेची बाब आहे, असे उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले होते.