प्रवासी कमी असणाऱ्या गाड्या रद्द
पुणे – करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू केली आहे. यामुळे रोजीरोटीचे साधन बंद झाल्याने, स्थलांतरींनी मूळ गावी जाण्याचा पर्याय निवडला आहे. यामध्ये प्रामुख्याने उत्तरेकडील नागरिकांचा समावेश असल्याने, जास्त प्रवासी संख्या असणाऱ्या मार्गावरील रेल्वे गाड्यांच्या संख्येत प्रशासनाने वाढ केली आहे. तर प्रवाशांच्या अल्प संख्येमुळे रेल्वेने राज्यातील काही गाड्या रद्द केल्या आहेत.
लॉकडाऊनच्या धास्तीने मागील आठवडाभरापासून परराज्यांतील कामगारांनी मूळ गाव गाठण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे प्रामुख्याने रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. करोनामुळे रेल्वेच्या नियमित गाड्या अद्यापही रुळावर आल्या नसल्याने विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. प्रवाशांची वाढती संख्या आणि वेटिंग लिस्ट पाहता रेल्वेने विशेष गाड्यांच्या संख्येत वाढ केली आहे. मात्र राज्यातील काही गाड्यांमध्ये प्रवासी संख्या अत्यल्प असल्याने, प्रशासनाने गाड्या रद्द केल्या आहेत.
या गाड्या रद्द…
प्रवासी संख्या कमी असल्याने 1 मेपर्यंत मुंबई-गदग-मुंबई एक्स्प्रेस, 30 एप्रिलपर्यंत पुणे – नागपूर-पुणे एक्स्प्रेस, 2 मेपर्यंत पुणे-अजनी-पुणे एक्स्प्रेस, 29 एप्रिलपर्यंत पुणे-अमरावती-पुणे एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.