मुंबई – राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्रात लोकशाही नव्हे तर ‘लॉकशाही’ सुरू आहे, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, आम्ही नेहमी म्हणायचो महाराष्ट्रात लोकशाही आहे, पण आता लोकशाहीऐवजी लॉकशाही चालू आहे… म्हणजेच लॉकडाऊन. हे आवश्यक असले तरी जेव्हा लॉकडाऊन करतो, तेव्हा जे लोक रोजंदारीवर जगतात. अशा सामान्य माणसांना मदत करण्यासाठी तिजोरीत हात घातला पाहिजे. अडचणीत असलेल्या लोकांना मदत करण्याचे भान सरकारला नाही.
सरकारला मायबाप का म्हणतो कारण त्यांनी अडचणीत असलेल्या मुलांना मदत केली पाहिजे. सरकारने मदत केलीच नाही, पण वीजबिलाची वसुली मुघलांप्रमाणे केली असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला.
तसेच, हे सरकार लबाड असून बिल्डरांना ५ हजार कोटींची सूट सरकारने दिली परंतु शेतकऱ्यांकडून ५ हजार कोटींची वसुली सरकारने केली. अजितदादा खूप काही बोलतील पण हे लबाडांचे अवसान घेत आहेत. एक नवा पैसा या सरकारने पंढरपूरला दिला नाही. भाजप सरकारच्या काळात दुप्पटीने सोलापूर जिल्ह्याला पैसा दिला, असा दावाही देवेंद्र फडणवीसांनी केला.