मुंबई – देशभर करोना विषयक लसींचा तुटवडा निर्माण झालेला असताना मोदी सरकारने लसीकरणाचा उत्त्सव आज पासून देशभर सुरू केला आहे. संकट काळातही असले उत्सव साजरे करण्याचा भाजपला रोग जडला आहे अशी टीका प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक लसीकरण केंद्रे लसी अभावी बंद असताना लसीकरणाचा महोत्सव साजरा कसा होऊ शकतो असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला आहे.
लसीकरणा अभावी बंद पडलेल्या केंद्रांच्या बाहेर कॉंग्रेसचे कार्यकर्ते थाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा हे आंदोलन करणार आहेत असे त्यांनी म्हटले आहे. देशात करोना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. पण देशातील जनतेला वाऱ्यावर सोडून पाकिस्तानला मोफत लस दिली गेली आहे हा या बेजबाबदारपणा आहे. लसीच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर लसीची निर्यात सरकारने बंद केली पाहिजे असेही पटोले यांनी म्हटले आहे.
लसीच्या बाबतीत महाराष्ट्रावर अन्यायच झाला आहे असे सांगताना ते म्हणाले की आज महाराष्ट्रापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गुजरातला मोठ्या प्रमाणावर लस पुरवठा करण्यात आल्याचे आकडेवारीनिशी सिद्ध झाले आहे. विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्य सरकारांची कोंडी करून अपयशाचे खापर त्या राज्य सरकारवर कसे फुटेल यासाठीच मोदी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत असा आरोप त्यांनी केला. संकटकाळात वैद्यकीय उपकरणांसह अन्य बाबींची मदत करण्याऐवजी महोत्सव साजरा करून सरकार नाहक वेळ वाया घालवत आहे असेही पटोले यांनी म्हटले आहे.